सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Saturday, 4 April 2020

पेराल तेच उगवेल

             लॉकडाऊनमुळं संपूर्ण भारत घराघरात कोंडला गेला आहे. शाळा-महाविद्यालयं बंद असल्यानं औपचारिक शिक्षण बंद आहे, परंतु अनौपचारिक शिक्षण अव्याहत सुरू आहे. भारतातील अंदाजे 75% कुटुंबांकडे टीव्ही आहेत. फेब्रवारी 2020 च्या एका अहवालानुसार भारतातील सुमारे 40 कोटी लोक whats app वापरतात. सुमारे तेवढेच लोक फेसबुक वापरतात. ग्रामीण भागातील सुमारे 90% कुटुंबांकडे मोबाईल फोन्स आहेत. यावरून असं म्हणता येतं की 0 ते 6 वयोगटातील बालकं (सुमारे 10 ते 15%%) वगळली तर उर्वरीत 85 ते 90% जनता घरात (अत्यावश्यक सेवेतील लोक घराबाहेर वेळ मिळेल तेव्हा) टीव्हीवरील न्युज चॅनल्स पाहून, व्हाट्सॅप-फेसबुकवर वाचून, चर्चेत सहभागी होऊन, 6 ते 18 वयोगटातील मुलं बातम्या पाहून, घरातील चर्चा ऐकून- चर्चेत सहभागी होऊन देशातील एकूणच परिस्थितीबाबत माहितीचं देवाणघेवाण करत आहेत, आपापली मतं बनवत आहेत. दुस-या शब्दांत सांगायचं तर भारतातील सुमारे 85 ते 90% मेंदुंचं वैचारिक/बौद्धिक पोषण सध्या मिडीया व सोशल मिडीयाच्या माध्यमातून होत आहे. (वाचन व तत्सम बाबींचा अपवाद आहेच.)
                पेराल तेच उगवेल ही म्हण माणसांच्या बाबतीतही 100% लागू पडतेच हे कुणीही अमान्य करणार नाही. म्हणूनच लॉकडाऊनच्या या चिंताग्रस्त काळात औपचारिक शिक्षण बंद असल्यामुळं अनौपचारिक शिक्षण देणा-या पालक, मिडीया व सोशल मिडीयाची जबाबदारी किती वाढली आहे हे लक्षात येईल. या काळात  मनामनावर जे जे बिंबवलं जाईल, ते ते मनात घट्ट बसून कोरोनासंकट निवळल्यावर विचार म्हणून, संस्कार म्हणून आज घरात बसलेल्या 6 वर्षाच्या शिक्षणक्षम बालकांपासून वयोवृद्धांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहू शकतं. या काळात घडणा-या घटना, झडणा-या चर्चा गांभिर्यपूर्वक ऐकणा-यांपैकी  किमान 50% लोकांच्या मनाततरी त्या कायम घर करून राहण्याची शक्यता आहेच आणि त्याचा सर्वांच्या भविष्यावर काहीएक परिणाम निश्चितच होणार आहे.
                ही शक्यता जर खरी वाटत असेल तर सर्वांना यावर गांभिर्यपूर्वक विचार करण्याची गरज आहे हे मला सांगायचं आहे. मिडीयापर्सन्सनी व सोशल मिडीया वापरकर्त्यांनी, पालकांनी बातम्या, घटना, घोषणा, इत्यादीबाबत तर्कशुद्ध विचार करूनच, खात्री करूनच चर्चा करावी. घराघरातल्या बालकांच्या, युवकांच्या मनात कुणाविषयीही द्वेष निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. कोरोनासारखी संकटं
येतील, जातील, पण भारतासारख्या खंडप्राय देशाच्या ऐक्यासाठी संकट निवळल्यावरही शांततामय जनजीवनासाठी आताच काळजी घेणं महत्त्वाचं आहे हे नाकारून कसं चालेल?

(आणि हो, कोरोनाचं जागतिक संकट निवळल्यानंतर संपूर्ण जगाला जणू नवजीवन प्राप्त होणार आहे. नवं युगच अवतरणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातील आपल्या राजकीय भूमिका भावी नवयुगावर नव्या संकटाचं सावट निर्माण करणार नाही यावर विचारमंथन होणंही अतिआवश्यकच.)

~ राजीव मासरूळकर

2 comments:

  1. Nakkich. Pan kahi videos aset ki durlakshnyasarkhe nahit.

    ReplyDelete
    Replies
    1. त्यातले काही खोटे असल्याचं bbc व abp माझाने दाखवलं आहे. आपले लोकही अनेक ठिकाणी एकत्र येत आहेत पण त्याची तेवढ्या तिव्रतेनं चर्चा होत नाही. बातम्या मात्र येत राहतात.

      Delete