सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Sunday, 21 May 2017

मी खुला बाजार झालो...

गझल

उष्ण झालो गार झालो
मी खुला बाजार झालो

तोलले आभाळ सारे
पण भुईला भार झालो

पंख मी फैलावले अन्
माणसांनो , घार झालो

त्या फुलाने स्मित केले
मी उरी गंधार झालो

घेतली माघार थोडी
तोच फुसका बार झालो

मी खऱ्‍याचे ढोंग केले
ईश्वरी अवतार झालो

मी खरे बोलून गेलो
लोकहो , गद्दार झालो

घेतली स्वेच्छानिवृत्ती
मी घरी भंगार झालो

नेमका दुष्काळ पडला
अमृताची धार झालो

चुंबिले तू मज असे की
तत्क्षणी मी ठार झालो !

- राजीव मासरूळकर
दि.२९.६.२०१२
रात्री १०.३० वाजता
पानवडोद,ता सिल्लोड

मंत्रालयाला आग लागते तेव्हाची कविता...


आग आणि खुर्ची

घरात आग
दारात आग
नारीत आणिक
नरात आग
उजेडात आग
अंधारात आग
ज्वानीच्या ऐन
भरात आग
रानात आग
रणात आग
सृष्टीच्या
कणकणात आग
पाण्यात आग
गाण्यात आग
खणखणणाऱ्‍या
नाण्यात आग

आग अशीच पसरत चाललीय
कणापासून
मनामनापर्यंत ..........
साम्राज्यांचं धुपट निघालं,
किल्ले गेले,
वाडे जळाले....
मंत्रालयाचे तिला वावडे नाहीच......
फायली जळतील,
माणसं जळतील .....
पण
खुर्ची कधी जळते काय . . . . . . . . . . . . ?

खुर्ची हा आत्मा आहे
कृष्णाने सांगितलेल्या
भगवद्गीतेतल्यासारखा . . . . . . . .

हे लोकशाहीवाल्यांनो ,
खुर्ची कधी जन्मतही नाही
कधी मरतही नाही
खुर्चीवर बसणारेच मरतात फक्त !

जो खुर्चीला नाशरहित
अजन्म नित्य अव्यय
मानतो
तो इतरांना मारूनही
न मारणाराच !

जशी झाडं पिकलेली पानं त्यागून
नवी पालवी धारण करतात
खूर्चीही अशीच
माणसं बदलत राहते . . . . . . . . . !

खुर्ची शस्त्राने कापल्या जात नाही
आगीत जाळल्या जात नाही
पाण्यात बुडवून नष्ट केल्या जात नाही
सोसाट्याचा वाराही
तिला हलवू शकत नाही !
कारण . . . . . . . .
ती अच्छेद्य आहे
अदाह्य आहे
अक्लेद्य आहे
अशोष्य आहे . . . . . . . !

खूर्ची नित्य
सर्वव्यापी
अचल आणि
सनातन आहे !

म्हणूनच म्हणतो
खुर्चीला सलाम करा
खुर्चीवर बसणाऱ्‍याला सलाम करा . . . . .

कारण
घरात आग
दारात आग
नरनारींच्या
'दप्तरा'त आग . . . . . . . . . . . . . . !

- राजीव मासरूळकर
दि . २१.०६. २०१२
रात्री ९.४५ वाजता
Jun 22, 2012

का.....?

का पुन्हा पुन्हा
भरून येतं ऊर ?
कुणाच्या हा आठवांचा
अनामिक पूर ?
का कुणी पाठीमागे
असण्याचा भास ?
का मनी हसतं
कुणी दिलखुलास ?
का साग झडतो
झडझडून पानं ?
का येतं ओठी असं
हुरहुरभरलं गाणं . . . . ?

- राजीव मासरुळकर

निघालीस सखे कुठे?



निघालीस सखे कुठे विचारीत गाव ?
तुझ्या गालावर माझ्या ओठातले भाव !

पोटऱ्‍यांत आली बघ शेतातली पिके
सांग बरे , मातीही का साहते हे घाव ?

पंख झडलेल्या जरा मयुरांना सांग
सुर्याआड झोपलेल्या जलदांचा ठाव !

संध्याकाळ होत आली भोवताली सखे
चराचरी करीताहे प्रीत शिरकाव !

खराखुरा अंधःकार भिववितो गडे
खोट्या प्रकाशाचा आता तरी दिवा लाव !

- राजीव मासरूळकर

निसर्गरीत

दर संध्याकाळी
इथे येते
पाचपन्नास वानरांची
एक बावनबीर टोळी !

कुणाच्या हातात वाळलेल्या पोळ्या
कुणाच्या हातात भाकरीचे कुटके
कुणाच्या हातात मकेची कणसं
कुणाच्या हातात फळंफणसं
कुणाच्या पोटाला गुलाबी लेकरं
सगळ्याच तोंडून पोटभर ढेकरं !

ती इथे दररोज येतात
हात उगारणाऱ्‍यावर दात विचकत
कडुलिंबाच्या झाडावरून उतरून
शाळेच्या खिडक्यांमधून डोकावत
जाऊन बसतात वडाच्या फांद्यांवर
एकमेकांच्या पाठीवरील उवा खात !

सुट्टीच्या दिवशी
काही हळूच शिरतात
उघड्या खिडकीतून
शाळेच्या खोलीत
मुततात , विष्टतात बाकाबाकांवर
फळ्यावरील काळ्या अंधारात
जाऊ न देता थोडाही तोल
पाहतात आपला इतिहास भूगोल
आणि परत फिरतात समाधानी होऊन
कि कुणीच कुणावर विचकले नव्हते दात
कुणीच कुणाचा केला नव्हता घात
आणि कुणीच कुणावर केली नव्हती मात !

जगणं हाच त्यांचा अनुभव
अनुभव हेच त्यांचं जगणं !
कुणी जन्मल्याचा उत्सव नाही ,
कुणाच्या मरणाचं फारसं सोयरसुतक नाही !

ती इथे दररोज येतात
आडावरच्या बादलीमधलं पाणी पितात
शेवग्याचा पाला
ओरबाडून ओरबाडून खातात
आणि जाऊन बसतात
वडाच्या शेंड्यावर
वडाची लाल पोपटी
कोवळी कोवळी पानं खात !

मिळेल तसलं खाणं
वाटेल तिथं राहणं
वाटेल तेंव्हा एखादी शेपूट वर करणं
कळा आल्या की जनणं
काळ आला की मरणं !

मुखी कुठे वेद नाही
संस्कृतीचा खेद नाही
काळा गोरा भेद नाही
संपत्तीचा मेद नाही !

शाळेचा अभ्यास नाही
फैशनचाही फास नाही
प्रसिद्धीहव्यास ­ नाही
मुक्तीचाही ध्यास नाही !

देवाधर्मांचा सडा नाही
धर्मग्रंथांचा काढा नाही
पापांचा कुठे पाढा नाही
पुण्याचाही राढा नाही
पश्चातापाचा किडाही नाही
रांधा-वाढा-उष्टी काढा, नाहीच नाही !

विज्ञानाचा मंत्र नाही
वेळेच्या हातातलं यंत्र नाही
आधुनिक आधुनिक तंत्र नाही !

बोकाळलेल्या माणसाचे
हे आहेत मायबाप
दुःख, दैन्य, बेचैनीचे
बांधलेले माथी शाप !
माणसा, माणसा, शिक, शिक
विटला-बाटला आत्मा विक
बिघाड बुद्धी, कर ठीक
क्षमेला क्षमेची माग भीक
काळोखाकडे नेणाऱ्‍या या
शुभ्र मार्गा मार कीक !

ती इथे येतात
अनादिकाळापासूनच
टोळीटोळीने . . . . .
धरतीला धरून
अनंत जगण्याची निसर्गरीत
माणसाला शिकवण्यासाठी . . . . . . !

- राजीव मासरूळकर
मु पो मासरूळ
ता जि बुलडाणा

http://m.facebook.com/groups/184609531574665?view=permalink&id=478505755518373&refid=18&_ft_=src.24%3Asty.308%3Aactrs.100002716249877%3Apub_time.1359253360%3Afbid.478505755518373%3As_obj.4%3As_edge.1%3As_prnt.11%3Aft_story_name.StreamStoryGroupMallPost%3Aobject_id.184609531574665%3Aobject_timeline_token_map.Array

रिक्तता...


रिकामी नजर, श्वासही हे रिकामे
रिकामे कसे शब्द सारे, जीवा?
रिकामेच गेह, रिकामाच देह
रिकामी निकामी कशी ही हवा?

न जाणीव ...न स्पर्श होई कुणाचा
कि घोट प्यालो मी हलाहलाचा
न मी अंतराळी, न भूमीवरीही
न पाय मज अन् न थारा कुणाचा
खरा सूर्य भासे जणु काजवा!

भरारा निरर्थक शब्द:धुराळा
अंतर्मनी गरगरे कु:पाचोळा
न साद कुठली, न छाया कशाची
निष्पर्ण खोडांचा फुटलाय पोळा
आणि पंख तुटलेला मी पारवा!

साठेबाज अश्रू, नफेखोर माया
यंत्रवत जगाचा बघे घास घ्याया
न मी कुणाचा, न कोणी कुणाचा
अनिश्चिततेचे सत्यनीर प्याया
लुटारूंची येथे सुरू वाहवा!!!

~ राजीव मासरूळकर

वार्धक्य

मलाच माझे असणे आता जाचत आहे
उसवुन गेली वाकळ पुन्हा टाचत आहे

मनात असते कायम भीती मोहरण्याची
निर्माल्याचा कचरा नुसता साचत आहे

डोळ्यांमधले रंगच गेले हरवून माझ्या
कारण देवा भगवद्गीता वाचत आहे

आसपास ही अतीभयावह मरणशांतता
स्मशान झाले जीवन मृत्यू याचत आहे

वेळ कशाला? मिठीत सत्वर ये यमदेवा
जीव तुझ्या स्वागते पोरका नाचत आहे !

जाताना का वळून मागे पाहतोय मी
देह एकटा अजूनही ... हे जाचत आहे !

- राजीव मासरूळकर
दि १०.१०.११
दु ३ वाजता