सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Sunday, 21 May 2017

मंत्रालयाला आग लागते तेव्हाची कविता...


आग आणि खुर्ची

घरात आग
दारात आग
नारीत आणिक
नरात आग
उजेडात आग
अंधारात आग
ज्वानीच्या ऐन
भरात आग
रानात आग
रणात आग
सृष्टीच्या
कणकणात आग
पाण्यात आग
गाण्यात आग
खणखणणाऱ्‍या
नाण्यात आग

आग अशीच पसरत चाललीय
कणापासून
मनामनापर्यंत ..........
साम्राज्यांचं धुपट निघालं,
किल्ले गेले,
वाडे जळाले....
मंत्रालयाचे तिला वावडे नाहीच......
फायली जळतील,
माणसं जळतील .....
पण
खुर्ची कधी जळते काय . . . . . . . . . . . . ?

खुर्ची हा आत्मा आहे
कृष्णाने सांगितलेल्या
भगवद्गीतेतल्यासारखा . . . . . . . .

हे लोकशाहीवाल्यांनो ,
खुर्ची कधी जन्मतही नाही
कधी मरतही नाही
खुर्चीवर बसणारेच मरतात फक्त !

जो खुर्चीला नाशरहित
अजन्म नित्य अव्यय
मानतो
तो इतरांना मारूनही
न मारणाराच !

जशी झाडं पिकलेली पानं त्यागून
नवी पालवी धारण करतात
खूर्चीही अशीच
माणसं बदलत राहते . . . . . . . . . !

खुर्ची शस्त्राने कापल्या जात नाही
आगीत जाळल्या जात नाही
पाण्यात बुडवून नष्ट केल्या जात नाही
सोसाट्याचा वाराही
तिला हलवू शकत नाही !
कारण . . . . . . . .
ती अच्छेद्य आहे
अदाह्य आहे
अक्लेद्य आहे
अशोष्य आहे . . . . . . . !

खूर्ची नित्य
सर्वव्यापी
अचल आणि
सनातन आहे !

म्हणूनच म्हणतो
खुर्चीला सलाम करा
खुर्चीवर बसणाऱ्‍याला सलाम करा . . . . .

कारण
घरात आग
दारात आग
नरनारींच्या
'दप्तरा'त आग . . . . . . . . . . . . . . !

- राजीव मासरूळकर
दि . २१.०६. २०१२
रात्री ९.४५ वाजता
Jun 22, 2012

No comments:

Post a Comment