सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Sunday, 15 October 2017

नि:संग

आपण करू लागलो नियमित
आपलं काम
प्रामाणिकपणानं
कि काळ बिथरतो
आणि
घोंगावत येतं कामचुकार वर्तमानाचं विस्फोटक वादळ....!
उगारले जातात खोचक प्रश्न
आपल्या सचोटीवर
आणि सार्वजनिकरित्या केलं जातं
भावना बोथट करणारं
बिभत्स चारित्र्यहनन...
तेव्हा
कापून काढावेसे वाटतात
नभापलिकडे झेपावू बघणारे
मनाचे कल्पक पंख
नको तिथे डोकावणा-या,
हवे तिकडे कानाडोळा करणा-या
या डोळ्यांमध्ये घालावेसे वाटतात टोकदार खिळे
ऐकलेल्या अफवांची तात्विक चिरफाड करणा-या
आपल्याच कच्च्या कानांच्या भिंती
लिंपाव्याश्या वाटतात
उकळत्या लाेहरसाने
सोलून काढावीशी वाटते अंगावरची ही स्पर्शातूर
चित्ताकर्षक त्वचा
छाटून टाकावेसे वाटतात
हव्यासामुळे हपापलेले
स्वत:चेच हात.... पाय.... जीभ... लिंगही...
उतरवून टाकावासा वाटतो स्वत:तला सगळा माज
ज्ञानाचा... पैशाचा... यशाचा... पदाचा.... प्रतिष्ठेचा
तोडून टाकावीशी वाटतात
स्वार्थासाठी टिकलेली भंपक नातीगोती
उधळून द्यावेसे वाटते सगळे स्थावर जंगम
किड्यामुंग्यांवरती
आणि व्हावंसं वाटतं नि:संग....
ढगामधून कोसळणा-या
दगडामधूनही पाझरणा-या
नदीमधून खळाळणा-या
स्वच्छ स्वच्छंदी पाण्यासारखं.....

पण..........
आपल्या या शांत निर्मळ पाण्यात
माणसं
स्वत:ची पापं धुणारच नाहीत
याचा काय नेम?

~ राजीव मासरूळकर
    सावंगी, औरंगाबाद
    दि.12/10/17 09:45 pm

No comments:

Post a Comment