सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Tuesday, 21 April 2020

तो म्हणाला

तो म्हणाला,
जगावरचं हे संकट टळलं की
सगळं काही ठीक होईल.
मी म्हणालो, काय ठीक होईल?
तो म्हणाला, हे जे गरीब आहेत ना,
ते गरीब राहतील अन् हे श्रीमंत श्रीमंतच.

★  ★  ★

मी म्हणालो, पण हा सगळा खटाटोप कशासाठी?
तो म्हणाला, गरीबांना जगवण्यासाठी.
मी पुन्हा म्हणालो, पण गरीबांना का जगवायचं?
तर तो गंभीर होत म्हणाला, मग हे श्रीमंत कसे जगू शकतील?

★  ★  ★

तो म्हणाला, गरिबांचा विकास झाला पाहिजे.
मी म्हणालो, त्याने काय होईल?
तो म्हणाला, बाजार वाढेल.
मी पुन्हा म्हणालो, त्याने काय होईल?
तो छाती फुगवत म्हणाला, श्रीमंत आणखी श्रीमंत होतील.

★  ★  ★

मी म्हणालो, हे बिचारे गरीब
पिढ्यान् पिढ्या गरीबच का आहेत?
तो म्हणाला, त्यांना श्रीमंत होता येत नाही म्हणून.
मी कळवळून म्हणालो, त्यांना श्रीमंत कसं होता येईल?
तर तो हसत हसत म्हणाला,
ते गरीबांनाच श्रीमंत करू लागतील, तेव्हाच.

★  ★  ★

~ राजीव मासरूळकर

No comments:

Post a Comment