सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Monday, 29 May 2017

सरडेदादा

सरडेदादा ,
किती सापेक्ष बघतोस तू साऱ्‍या जगताकडे
इथल्या जीवघेण्या धांदलीचा आवंढा गीळत . . . . .. . .

कुठं काही खुट्ट झालं तरी
रस्ता बदलणारा तू
ठरलास ना रक्तपिपासू . . . . .. . ?

अरे ,
फुकाची केळीसुद्धा
लुटलेल्या लोण्यासोबत गिळणाऱ्‍या
या श्वेतवर्णी शर्विलकांना काय माहित
चार दिवस वाळलेले कडवट कुटके
घसा कसे रक्तबंबाळ करीत जातात म्हणून . . . . . . . . .
तरीही तू शांतच
तुझे दगडी डोळे बघतात सापेक्ष
मान न कलवता
वादळात गुरफटलेल्या पाचोळ्यागत जगताकडे . . . . . .. . . !

सरडेदादा ,
जेव्हा येतात तुझ्याकडे
पांढऱ्‍या वेशातले काळे बगळे
आपापले ध्वज घेऊन
हात जोडून
भावनिक साद घालत
आभाळभर आश्वासनं देत
तेव्हा
ठरतोस तू
रंगबदलू . . . . . .
आणि
गारद गारद्यांची
शेंबडी शेंडेफळंसुद्धा
काठ्यांचे फास करून
घोटू पाहतात तुझा गळा . . . .. . . .
करू पाहतात तुझा चेंदामेंदा . . . . . . . . . . !

म्हणे तुझं रक्तच थंड
हिमालयातल्या हिमासारखं
गार गोठलेलं . . . . . .
नव्हे ,
तुझे श्वासच गोठलेले
एका घनगर्द हिरव्या वर्तुळात . . . . . . .
अरे ,
समाधिस्त भासणारे धुर्त बगळेसुद्धा
नेमका नेम साधून
वर्तुळातलेच मासे टिपतात
हे काय तुला ठाऊक नाही . . . .. . . . ?

म्हणूनच म्हणतो ,
सोड तुझा तो रंगबदलू भ्याडपणा ,
फोड ते कवच
तूच आवळलेलं
तुझ्याभोवतीच घट्ट . . . . . . .. .
आणि सांग जगाला ओरडून
तुझं अस्तित्व . . . . .
तुझं कर्तृत्व . . . . . .
तुझं महात्म्य . . . . . . . !

आणि लक्षात ठेव ,
जर आलेच तुझ्याकडे
लोकशाहीचे
हुकुमशाही खोजे
दडपशाहीचे कुपमंडूक दंडुके घेऊन
दमदाटी करत
तर
दाखवू नकोस त्यांना
तुझी पोपटपिवळी पाठ
नाहीतर . . . . . .
टपून बसलेलं हे लुटारू जग
काळ्या मातीने पोसलेल्या छात्यांना
षंढ ठरवून
तुझं पिंंगट पोट
तुडवल्याशिवाय राहणार नाही......
लक्षात ठेव . . . . . . . . . !

- राजीव मासरूळकर
मु पो मासरूळ
ता जि बुलडाणा

पाऊसधारा

हा हा वारा
या पाऊसधारा
हा वारा या पाऊसधारा
वाहून मज नेती कुठे ?
घेऊन मज जाती कुठे ?

लुसलुसणाऱ्‍या गवतावर
पडती थेंब जणु दहिवर
त्यातून वारा वाहे भरारा
पाहून मजला हसू फुटे !

झुळझुळणाऱ्‍या झऱ्‍याकडे
बळे ओढती मजला गडे
मंजुळ मंजुळ गीत आणखी
डोळ्यांचे पारणे फिटे !

उंच उंच हिरवा डोंगर
क्षितिजापलिकडे फिरवी नजर
आभाळाचे चुंबन घेण्या
पुढती सगळे सुख थिटे !

"पक्ष्यांनो, आणखी भिजा,
या, पाणी उडवू , किती मजा !
अभ्यासाची घरकामाची
कटू सजा ना इथे भेटे !"

"चिंंब चिंब भिजण्याचे असे
कुणी लावले तुला पिसे ?"
माळावरची फुले पाहुनि
आईचा मग रूसवा सुटे !

हा हा वारा या पाऊसधारा !

हा हा वारा या पाऊसधारा ! !

- राजीव मासरूळकर
मु पो मासरूळ
ता जि बुलडाणा

बरेच झाले

दुःखाने मी कधी न चळलो बरेच झाले
माझा मी ही मलाच कळलो , बरेच झाले !

अवतीभवती गुच्छ फुलांचे खूप लगडले
अवचित मीही सुगंधाळलो , बरेच झाले !

साद घालण्या समोर आल्या लंपट वाटा
काट्यांमधून मी भळभळलो , बरेच झाले !

पाऊस येता झडून गेला मोरपिसारा
मी ही थेंंबांसंगे ढळलो , बरेच झाले !

पश्चिम झाली लालबुंद कुंकवासारखी
आणि अचानक मी मावळलो , बरेच झाले !

- राजीव मासरूळकर
दि .२.६.१२
रात्री १०.१५ वाजता

Saturday, 27 May 2017

कवी

कवी

ग्रामीण कवी
चारचाकीत बसून
कवीसंमेलनासाठी
शहरातून
गावात येतो...
दारिद्र्याच्या
शेतीमातीच्या
आत्महत्येच्या
त्यावर होणा-या राजकारणाच्या
त्याच त्या
चार कविता ऐकवतो
अन् जागवतो आशावाद...
गोळा झालेलं गाव
करतं टाळ्यांचा कडकडाट...
शहरापेक्षा
गावातच मिळतो मोठा प्रेक्षकवर्ग
अन् मिळते मोठी दाद
असं पुन:पुन्हा मनावर गोंदवून
कवीसंमेलनानंतरचा
पाहूणचार आटोपून
मानधन नको, तर
गाडीत तेल भरायला का होईना
गावानं दिलेलं पाकीट
जड अंत:करणानं
खिशात कोंबून
आल्या चारचाकीतूनच
शहराकडे निघून जातो
ग्रामीण कवी.....

गावही मग
झालं गेलं विसरून
शेतीमातीत गुंग होऊन
जगत राहतं
आपल्याच गतीत..

~ राजीव मासरूळकर
   27/5/2017 02:20 pm

Tuesday, 23 May 2017

कोणीही जीवलग नाही


कोणीही वैरी नाही, कोणीही जिवलग नाही
या श्वासांमध्ये माझ्या थोडीही लगबग नाही

आभाळ निळ्या बुरख्याचे लपवून उन्हाळे बसले
अन् पृथ्वी पंखांखाली घेईल असे खग नाही

श्वासांच्या पैलतिरावर अंधार पसरला आहे
हृदयाची धक् धक् नाही, पैशांची झगमग नाही

बापाच्या डोळ्यांमध्ये हर्षाने आले पाणी
जन्मात एवढे हळवे मज दिसलेले ढग नाही

चल, एक नवे जग शोधू, माणूस जगवण्यासाठी
हे देवधर्मजातींचे जगण्यालायक जग नाही!

~ राजीव मासरूळकर
   04/02/2016
   सावंगी, औरंगाबाद

Monday, 22 May 2017

थेंबामधेच सागर


रागातही असे कर
तोंडात ठेव साखर

विज्ञान, धर्म सांगे
थेंबामधेच सागर

जगतात चंद्र तारे
ठेवून योग्य अंतर

कायम हवी मला ही
हृदयामधील थरथर

भिंती नसो , न दारे
अंबर असो खरे घर !

- राजीव मासरूळकर
दि २० ऑक्टो २०१३
सायं ७.१५ वाजता

वाटत वाटत


चढणे नव्हे चढणे, तळवे चाटत चाटत
जगणे नव्हे जगणे, पैसा लाटत लाटत

आसपास तव असता गंधित दरवळ, वावर
दूर जराही कुठेच नाही जावे वाटत

प्रकाशनाच्या आधी खडतर दिवस असे की
पुस्तक आयुष्याचे आले पुरते फाटत

त्याने बघून केले जेंव्हा मज दुर्लक्षित
तेंव्हापासून नाही मी ही नाचत थाटत

दुःख करत आलो मी गोळा दुखीजनांचे
जाता यावे शेवटास, सुख वाटत वाटत

- राजीव मासरूळकर
दि १९ऑक्टो२०१३
रात्री११.३०वाजता