हे पृथ्वीमाये,
तुला कधी प्रश्नच पडला नाही -
"मी माणूस जन्मालाच घातला नसता तर ?"
या पांढऱ्या पायांनी
का तुडवून घेते आहेस तू
स्वतःचं स्वयंभू, सोनेरी कपाळ ?
तू याला पंचतत्वांतून जन्मी घातलंस,
रानावनांतून वाढवलंस,
उधळून दिलास तुझा
प्रचंड वेदना सहन करून साठवलेला
स्वयंनिर्मित
पोटभर खजिना याच्यावर . . . . ,
रक्ताचं लेकरू म्हणून सांभाळंस याला तू,
सृष्टीची शोभा दाखवलीस,
निर्झराचं गीत ऐकवलंस,
भरभरून मेंदू दिलास याच्या डोक्यात . . . . . .
आणि आज . . . .
तुझा सर्वात मोठा शत्रू कोण
म्हणून विचारलं
तर काय उत्तर देशील . . . . . ?
'माणूस'च ना . . . . . ?
तू रागावतच नाहीस याच्यावर
असंही नाही म्हणत मी
क्रोधानं तुझं थरथरणंही अनुभवलंय !
पण
पुन्हा तू शांत झालीस की
हे पृथ्वीमाये,
वाटतं -
तू
माणसाला जन्म दिल्याचा पश्चाताप करीत
अश्रू ढाळीत बसली आहेस . . . . . !
- राजीव मासरूळकर
"मनातल्या पाखरांनो"
२००६ मध्ये प्रकाशित
No comments:
Post a Comment