सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Sunday, 7 June 2020

आकड्यांचा खेळ


आकड्यांचा खेळ वाईटच...

आकडे सुरूवातीला आश्चर्याचा धक्का तरी देतात
किंवा घाबरवून तरी सोडतात आपल्याला

काही दिवस बेरीज, वजाबाकी सुरू राहते आलटूनपालटून. धाकधुक चालते क्षणाक्षणाला जिकडेतिकडे. 
मग अधूनमधून गुणाकार व्हायला लागतो.
आकडे फुगायला लागतात.
ते फुगायला लागले की
अक्षरश: भंडावून सोडतात आपल्याला काही दिवस
सुचूच देत नाहीत दुसरं काहीही
कधी आनंदही देतात
तर कधी चिडचिड होत राहते सतत

सरावाने होऊ लागते आकड्यांची सवय
मग भागाकारही व्हायला लागतो आकड्यांचा
लपवाछपवी झाली तरी आपल्याला फरक पडेनासा होतो मग
मग आपण चक्क दुर्लक्षही करायला लागतो आकड्यांकडे
आकडा फुगला काय, रोडावला काय
काहीच वाटत नाही आपल्याला

आकड्यांवरून नजर फिरत राहते,
 पण त्यांचा अर्थ मेंदूपर्यंत पोहोचेनासा होतो
निर्विकार होत जातो आपण आकड्यांच्या बाबतीत
कोरडेठक्क होत जातो
कठोर होतो
मग हादरवून सोडू शकत नाहीत आपल्याला आकडे पुर्वीसारखे
आनंदही देऊ शकत नाहीत

मग चक्क आकडे पाहणंच बंद करून टाकतो आपण
अर्थात आकड्यांमुळे डोकेदुखी वाढू नये
याची पुरेपूर दक्षता घेण्यात सराईत झालेलो असतो आपण

आपण स्वत:साठी, कुटुंबासाठी वेळ काढायला लागतो
जन्ममरण असो, स्थावरजंगम असो,
धंदापाणी असो, भावभावना असो,
पसारा वाढत जातो
आपल्या प्रिय कुटुंबाला
आकड्यांच्या या भीषण खेळापासून
दूर ठेवण्याच्या प्रयत्नातही असतो सतत
तरीही कुठल्यातरी माध्यमातून आलेच आकडे समोर,
तरी ते करू शकत नाहीत आपल्याला विचलित.

आकडे आपली नजर मारून टाकतात
की आपली नजर आकड्यांना मारून टाकते ...
नकळे!

आकड्यांचा खेळ वाईटच!

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि. 5 जून, 2020

Wednesday, 3 June 2020

ङ् , ञ् व त्र

DrVinayak Kapure यांनी त्यांच्या फेसबुक भिंतीवर उपस्थित केलेला प्रश्न असंख्य मराठी अबालवृद्धांच्या मनातला प्रश्न असल्याने तिथे comment म्हणून दिलेलं उत्तर थोडं विस्तृत स्वरूपात सर्वांसाठी इथे देत आहे. (अर्थात मराठीच्या जाणकारांना हे माहित आहेच, तरीही.)

#ङ_ञ_व_त्र

मराठी शिकणा-या, बोलणा-या शालेय वयाच्या बालकापासून पुढच्या कोणत्याही वयोगटातील अनेकजणांना मराठी वर्णमाला पाहिल्यावर एक प्रश्न हमखास पडतो कि हे ङ (वाङ्मय हा अपवाद वगळून) व ञ आपण मराठी लिहिताना कुठेच वापरत नसताना, का बरं वर्ण म्हणून शिकवले जात असावेत? बरं शाळेत यांचं लेखन व वाचनही शिकवणारे शिक्षक विरळाच. कसा उच्चार करायचा यांचा? मग काही जिज्ञासू शिक्षकांचा अपवाद वगळला तर ङ ला ड आणि ञ ला त्र म्हणत शिकवलं जातं. त्या शिक्षकांचासुद्धा तसा दोष नाहीच, कारण त्यांच्या गुरूजींनीही त्यांना असंच शिकवलं असणार. मग काय आहेत ही अक्षरं नक्की?

मराठी वर्णमालेतील व्यंजनांच्या पहिल्या दोन ओळी (वर्ग) अशा आहेत  :
क् ख् ग्  घ् | ङ्    (क वर्ग)
च् छ् ज् झ्  | ञ्    (च वर्ग)

ज्या शब्दात क, ख, ग, घ यापैकी एखादं अक्षर असून त्यांच्याआधी आलेल्या अक्षरावर अनुस्वार असतो, तिथे तो अनुस्वार ङ् असतो. उदा. शंख, अंग, रंग, अंक, अंघोळ, इ. पुर्वी हे शब्द शङ्ख, रङ्ग, अङ्ग, अङ्क, अङ्घोळ असे लिहिले जात. यावरून ङ हा क, ख, ग, घ शी संबंधित अनुनासिक आहे हे यावरून लक्षात येईल व त्याचा नेमका उच्चारही लक्षात आला असेलच.

ज्या शब्दात च, छ, ज, झ यापैकी एखादं अक्षर असून त्यांच्याआधी आलेल्या अक्षरावर अनुस्वार असतो, तिथे तो अनुस्वार ञ असतो. उदा. मंच, अंजीर, मांजा, कंचे, झुंज, , इ.  हे शब्द पूर्वी मञ्च, झुञ्ज, अञ्जीर, माञ्जा, कञ्चे इ. असे लिहिले जात. यावरून ञ हे च, छ, ज, झ शी संबंधित अनुनासिक आहे हे लक्षात येऊन त्याचा नेमका उच्चारही समजला असेलच.

वाङ्मय हा शब्द वाक्+मय (संधी) असा आहे,  त्यात क् चा ङ् झाला  आहे. वाङ्निश्चय सुद्धा तसाच. संधी नसेल, स्वतंत्र वर्ण म्हणून वापर नसेल, केवळ अनुनासिक म्हणून येत असेल अशा ठिकाणी ङ् व ञ् हे टिंब/अनुस्वार म्हणून आधीच्या अक्षरावर येतात.

ञ हा अनुनासिक आहे तर त्र हे त् + र = त्र असं जोडाक्षर आहे. दोन्ही भिन्न अक्षरं आहेत आणि त्यांचा उच्चारही भिन्न आहेत हे आता स्पष्ट झाले असेलच.

मराठीत ङ (क वर्ग), ञ (च वर्ग), ण (ट वर्ग), न (त वर्ग) आणि म (प वर्ग) असे पाच अनुनासिकं आहेत. यातील ण, न व म ही स्वतंत्र अक्षरं म्हणून वापरली जातातच,
पण ङ व ञ प्रमाणेच ते कंठ, कंद, कंप या व अशाच अनेक शब्दांत त्या त्या वर्गातील अक्षरांच्या अगोदरच्या अक्षरांवर अनुस्वाराच्या स्वरूपात विराजमान असतात. क, च, ट, त व प या पाच वर्गांतील अक्षरांआधी येणा-या अनुस्वारांचा उच्चार पाच भिन्न प्रकारे होतो, म्हणून प्रत्येकासाठी भिन्न वर्ण उपयोजिला आहे. भाषेत होणा-या प्रत्येक उच्चारासाठी स्वतंत्र वर्ण असावा असा विचार यामागे आहे. मात्र वरील पाचही वर्गांत नसलेल्या श, स व ह या वर्णांअगोदर आलेल्या अनुस्वाराचा उच्चार  वेगळा आहे हे ही लक्षात घ्यावे. उदा. वंश, कंस, सिंह, इत्यादि.

म्हणूनच, जर मराठी वर्णमालेत ङ व ञ हे वर्ण विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी दिलेले आहेत, तर ते शिक्षकांनी शाळेत वरीलप्रमाणे समजावून सांगायला हवेत. अगदी पहिल्या वर्गातच नको, पण पाचवी किंवा पुढील वर्गातील विद्यार्थ्यांना हे नक्की समजू शकेल. ते समजून सांगायला ग्रंथालयांत उपलब्ध स्वातंत्र्यापूर्वी प्रकाशित किंवा मराठीत अनुस्वाराचे नियम बदलण्यापूर्वी छापलेल्या मराठी पुस्तकांचा वापर करणं शक्य आहे. ते उपलब्ध नसतील तर काही संस्कृत सुभाषितांची मदत नक्कीच घेता येईल.

आता तुम्हाला समजला असेलच, तर शिकवाल ना आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना , आपल्या संपर्कातील सगळ्या मराठी भाषकांना ङ् काय असतो ते?  ञ व त्र मधला फरकही शिकवाल ना?

~ राजीव मासरूळकर
   दि.02 जून, 2020



Monday, 25 May 2020

वारी

दिंडी निघाली आहे पायी
दोनचार कच्च्याबच्च्यांच्या
एकदोन पिकल्या जीवांची पालखी करून
आयुष्याचं वृंदावन डोक्यावर घेत
कोसो दूर...

विटलेल्या लक्तरांच्या असंख्य पताका लोंबकळताहेत क्षीणपणे
स्वत:च्या जात, धर्म, पंथाची ओळख
उघडी पडू नये
याची काळजी घेत

दिंड्या निघाल्याहेत चहुबाजूंनी
अंधाराची, उजेडाची , ऊन, वारा, पावसाची
भुकेचीही तमा न बाळगता
सरकताहेत पुढे पुढे पुढेच
अबीर... गुलाल उधळण्याइतकी शक्ती उरलेली नाहीय
कुठल्याच हातात
मात्र थकल्याभागल्या अवस्थेतही
स्वाभिमानी जिद्दी पाय
तप्त रस्त्यांवर उमटवत आहेत
आत्मनिर्भर रक्ताचे लालबुंद ठसे
काळमार्गावरील मैलाचे दगड ठरत...

दरवर्षी असायचेच हमखास
इथेतिथे खुणावणारे हवेहवेसे मुक्काम
पण यावेळी मात्र रद्द झाले आहेत मधले सगळे मुक्काम
ठरलेल्या एकमेव मुक्कामाकडे
वारी करीत आहे  बेधडक मार्गक्रमण
अधुनमधुन रंगत आहे
श्वासांच्या उभ्या आणि गोल रिंगणांचा अनुपम्य सोहळा
प्राणांचे प्रकाशवेडे अश्व
सजूनधजून उधळत आहेत चौखूर
हे असं रिंगणात उधळणं
म्हणजेच रिंगणातून खरी सुटका...
हे कळून चुकलंय
सगळ्याच अश्राप वारक-यांना

वारीचं हे आगळंवेगळं रूप अनुभवताहेत
वारीचा जिवंत अनुभव नसलेले असंख्य बिचारे लोक
घरबसल्या लोळत आळसावत साग्रसंगीत

ही वारी जातेय एखाद्या गडगंज किर्तीवंत तिर्थक्षेत्राकडे
असं म्हणावं
तर त्यांचे सर्व दरवाजे झालेयत कधीचेच कडेकोट कुलुपबंद...
ही वारी निघालीय
गाव नावाच्या तिर्थक्षेत्रातल्या
घर नावाच्या मंदिराकडे...

वारकरी करताहेत प्रचंड घाई
त्यांना पोहोचवायची आहे आपापली दिंडी
गंतव्यस्थळी वेळेत
गाभा-यातली महापूजा अनुभवण्यासाठी!

मात्र
महापूजा होणार की नाही
झालीच तर करणार कोण
हे काही ठरता ठरत नाहीये....!

~ राजीव मासरूळकर
   दि.25 मे, 2020
   औरंगाबाद

Sunday, 17 May 2020

मोक्ष


कातरवेळ संधी देते
आणि ते आत येतात
भटकभटक भटकतात
जमेल तसं गुणगुणतात
मिळेल तसं पोट भरतात
रात्र बंद करून घेते दरवाजा अचानक
हवा यावी
आणि हवं तेव्हा स्वप्नांचं चांदणंही बघता यावं
म्हणून खिडकी तेवढी ठेवते उघडी
जाळीदार झडप घट्ट लागल्याची खात्री करून घेत.
मग कसलीशी कळ दाबून रात्र जाते झोपी
मग बदलत जाते तिथली हवा क्षणाक्षणाला
अन् गुदमरू लागतो त्या आगंतुकांचा जीव
होऊ लागते प्रचंड दमछाक
भीतीचे महाकाय मेघ दाटून येतात
सुरू होते मार्गांची शोधाशोध
अन् अखंड धावपळ
जाळीवर मारून होतात हजार टकरा
मार्ग तर दिसत असतो स्पष्टपणे
पण भेदता येत नाही काही केल्या
तरीही सुरूच राहतो अविरत संघर्ष
ताजीतवानी होऊन जेव्हा येते पहाट
आल्हाददायक खिडकीत
तेव्हा तिला दिसतात
जाळीला लटकलेले काही किडकिडीत मृतदेह
दिसतात अद्यापही जाळीशी झटत असलेले काही आशावादी जीव
त्यांचे होऊ नये अधिक काळ हाल
म्हणून आपल्या लांबसडक सराईत नाजूक बोटांनी
ती जाळीवरच टाकते त्यांना चिरडून
आणि बघत बसते हतबल जीवांना मोक्ष दिल्याच्या आनंदात
पूर्वेकडून उगवत असलेल्या नव्या सूर्याकडे
लोभसपणे!

राजीव मासरूळकर
दि.17/05/2020
औरंगाबाद

Saturday, 16 May 2020

ती म्हणजे


#लॉकडाऊनमध्ये_आलेला_लॉकअप_डे

ती म्हणजे

प्रेम हक्क अन् त्याग वगैरे ती म्हणजे
एक सुगंधी बाग वगैरे ती म्हणजे

दिवसदिवसभर जरी मला ती आठवते
रात्ररात्रभर जाग वगैरे ती म्हणजे

दोन क्षणांनी सरतो मागे पण येतो
नाकावरचा राग वगैरे ती म्हणजे

श्रावण ओलाचिंब कधी तर कधी शिशिर
रंग उधळता फाग वगैरे ती म्हणजे

ती म्हणजे चाहूल जणू सुख येण्याची
आयुष्याचा माग वगैरे ती म्हणजे

~ राजीव मासरूळकर
    दि.14 मे, 2020
    #लग्नाचा_वाढदिवस_वगैरे

कवी कविता लिहिताहेत

कवी कविता लिहिताहेत
कवी भरमसाठ कविता लिहिताहेत
भरमसाठ कवी भरमसाठ कविता लिहिताहेत
का लिहिताहेत कवी भरमसाठ कविता?

ज्येष्ठ प्रथितयश पुरस्कारप्राप्त साहित्यिक
समाजमाध्यमावर येऊन पाहताहेत
की भरमसाठ कवी भरमसाठ कविता लिहिताहेत
आणि मुख्य म्हणजे तोंड वर करून पुन्हा पुन्हा live सादरीकरण करून का मांडताहेत उच्छाद?
हे हौसेनवसे कवी का इतक्या कविता लिहून बदनाम करीत आहेत कवीकुळाला?
दररोज हजारो लोक किड्यामुंग्यांसारखे मरत असताना
मुकाट आसवं गाळत श्रद्धांजली अर्पण करत बसण्याऐवजी
घरात बसून का लिहिताहेत हे कवी उथळ वगैरे कविता?
या हौशानवश्यांच्या कवितांमुळे
चांगल्या कवितेचं होत असलेलं प्रचंड नुकसान
अस्वस्थ करीत आहे पुरस्कारप्राप्तवगैरे प्रस्थापित साहित्यिकांना..

समीक्षक पडले आहेत भयंकर पेचात
की का लिहित असावेत कवी भरमसाठ कविता?
का लिहिताहेत हे वेडे लोक हातोहात
डॉक्टर्सवर, पोलिसांवर, मजूरांवर, राजकारण्यांवर, दात्यांवर, प्राणीपक्ष्यांवर, निसर्गावर
सर्रास सहजसुलभ कविता?
का करीत आहेत दीर्घकाळापासून घराघरात कोंडलेल्या
हवालदिल हतबल सामान्य रसिकांचं
उठल्याबसल्या live येऊन मोफत मनोरंजन?
या संख्यात्मक वाढीचा किती जबरदस्त फटका बसेल आपल्या अभिजात वगैरे भाषेला?
स्वत:च्या घरात दाळदाणा असो नसो
संकटग्रस्तांना घरोघरी जाऊन मदतीचा हात देण्याऐवजी,
घरात स्वस्थ बसून टीव्हीवर सतत मृत्यूचा सोहळा
निर्विकारपणे बघत बसण्याऐवजी
का लिहिताहेत कवी लोकांच्या वेदनेवर, मरणावर इतक्या कविता?
थांबवायचं तरी कसं या जमेल तसं सरळसरळ लिहित्या हातांना
या प्रश्नाने पार भंडावून सोडलं आहे  काळामागे धावताना प्रचंड दमछाक होत असलेल्या समीक्षकांना

वृत्तपत्र, नियतअनियतकालिकांचे संपादक
विभिन्न प्रकारची पुस्तकं छापणारे प्रकाशक विचारताहेत
की का लिहिताहेत हे भरमसाठ कवी भरमसाठ कविता?
वृत्तपत्र, नियतकालिकं , पुस्तकं घरोघर पोहोचवण्यावर निर्बंध असताना
वाचक मिळण्याची शक्यता नसताना
का विनाकारण लिहिताहेत कवी इतकी सडकछाप कविता?
आम्ही छापतो त्यांची कविता न वाचता
का वाचाव्यात, पहाव्यात संकटग्रस्त रसिकांनी
या हौशानवश्या कवींच्या हलक्याफुलक्या, आक्रोश मांडणा-या, वेदना देणा-या चिल्लर कविता?
समाजमाध्यमांसारख्या आभासी जगात कविता व्हायरल करून
का आपला वेळ आणि उर्जा वाया घालवत आहेत हे असहाय जीव?

कवी स्वत:ही संभ्रमात आहेत
कि का लिहिताहोत आपण इतक्या कविता?
शक्य तितकी मदत केली
शक्य त्यांना आधार दिला
शक्य तितका ब्रेकिंग न्युजचा भडिमार सोसला
शक्य तितकं गुपचूप गुदमरत बसलोत घरात
सगळं जग घरात बसलेलं असतानाही
का घडताहेत बाहेर या प्रचंड हालचाली?
का जाताहेत हकनाक असंख्य निष्पाप जीवांचे बळी?
का पसरलं आहे घराघरांवर मृत्यच्या भयाचं सावट?
का नाही थांबत आपली वेदनादायी विचारप्रक्रिया?
का आपलं हळवं मन प्रवृत्त करतंय आपल्याला वारंवार
कविता लिहायला?
याच विचारचक्रातून कवी पुन्हा लिहायला बसले आहेत कविता
आणि कदाचित विचार करताहेत पुन्हा live येऊन
आपण अद्यापही जीवंत असल्याचा पुरावा देत
चारचौघांना जीवंत असल्याचा अनुभव देण्याघेण्याचा

सध्या सर्वत्र एकच जोरदार चर्चा आहे
की कवी भरमसाठ कविता लिहिताहेत.

~ राजीव मासरूळकर

Monday, 11 May 2020

सामना


अखेर
रंगला आहे
पोट आणि मृत्यू यांच्यात
एक अटीतटीचा अंतिम सामना

सामना...
घास मिळवण्याचा!

सामन्याने गाठले आहे
इतके रोमांचक शिखर की
पंचही विसरून गेले आहेत स्पर्धेचे कडेकोट नियम
आणि बघत बसले आहेत बेभान होऊन
कोण कुणाचा घास घेतो ते...

गोंधळभरल्या कोलाहलाच्या चित्कारांत
विरून गेले आहेत निस्तेज आवाज
फाऊल.. हाऊज दॅट आणि निषेधांचेही

मनात असीम उत्कंठा ठेवून
प्रचंड अस्थिरतेचा प्रेक्षक होत
मी ही बसलेलोच आहे
सामन्याच्या अंतिम क्षणाचा आस्वाद घेण्यासाठी
अधाशासारखाच...!

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि.11 मे, 2020