सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Monday, 29 May 2017

तुझ्यावर प्रेम माझे आणखी जडले


तळ्याकाठी किती पाणी , तरी झडले...
जसे हे झाड, माझेही तसे घडले !

मनाचा पोहरा विहिरीतटी ठेवुन
सभोती रान हिरवे हंबरुन रडले !

तुझ्या हातून माझा हात सुटला अन्
तुझ्यावर प्रेम माझे आणखी जडले !

परीक्षा पास झाले खूप शाळेच्या
खऱ्‍या प्रश्नांस उत्तर द्यावया अडले !

मनूजा, गर्भ अंधारी सदा वाढे
प्रकाशा काय दुःखाचे तुझ्या पडले ...?

- राजीव मासरूळकर
दि १९.०२.२०१३
दुपारी १.१५ वाजता

साले

2012 मध्ये गांधी घराण्याच्या (सरकारी) जावयाच्या भ्रष्टाचार प्रकरणानंतर सुचलेली ही कविता शेतक-यांना 'साले' म्हणणा-या दानवेंनाही तितकीच लागू पडते.......


करी राजकारण , मनी मोह ल्याले
लकी ड्रॉ , लिलावावरी देश चाले !

लवे , हात जोडे , बसे वाकळीवर
बघा ते खजीना लुटायास आले !

मते मोजुनी जे खिसा ओतताती
कळो ते जगाला विकाया निघाले !

समाजाप्रती ना कुणा काज चिंंता
खरे कार्यकर्ते तळाशी बुडाले !

खिळे नोकरांना विळे पामरांना
सग्यासोयऱ्‍यांना मिळे लांब भाले !

नको खंत राजीव मांडू विरोधी
तुला देशद्रोही ठरवतील साले !

- राजीव मासरूळकर
7.10.2012, 9.55PM
rajivmasrulkar@gmail.com

प्रार्थना


गुणगुणावे गीत आणिक
खळखळावे हास्यही
थंड व्हावा क्रोध माझा
अन् जळावे दास्यही !

चूल माझी चूक माझी,
दुःख माझे भूक माझी
काम, मत्सर, द्वेष जावा
अन् गळो आलस्यही !

तृप्ततेची हाव, स्वार्थ,
लोभही सारा जळो
प्रौढपण यौवन ठरावे,
सळसळावे बाल्यही !

भय नको मज कोणतेही
ना हो सीमा उंबरा
कर्म आधी मी करावे
मग करावे भाष्यही !

चाचरावी जीभ माझी
मागण्या कोणास काही
हात मागे ना सरावा
कुणि मागता सर्वस्वही !

- राजीव मासरूळकर
rajivmasrulkar@gmail.com

बाप्पास

बाप्पा ,
यंदा मान्सून आला
तसाच गेला आणि तूसुद्धा तसाच चाललास .
पिकांकडे पाहून शेतकऱ्‍यांचा उरात जाळ भडकतोय . कर्जाचे डोंगर हाडं पोखरताहेत त्यांचे .
जनावरांच्या चाऱ्‍याचा प्रश्न मिटला तरी पिण्याचं पाणी हातपाय खोरायला लावणार असं दिसतं .
तू जातोय बाबा मोठ्या जल्लोषात , पण
बघ जाता जाता एवढं विघ्न टाळता आलं तर .
आता तरी पाऊस पाड !

तू बुद्धीचा देव ! जगभरातल्या अव्वल ४०० विद्यापिठांच्या यादीत भारताचं एकही विद्यापीठ नाही हे निश्चितच सुखकारक नाही ना ?
जाता जाता आम्हाला थोडीतरी बुद्धी दे !

दररोज लाखो कोटींचे घोटाळे होताहेत , काही उघडही होताहेत ! देशाचा एकंदरीत कारभारच लिलाव आणि लकी ड्रॉ पद्धतीनं चालला आहे .
तुझ्या विचारांकडे दुर्लक्ष करून केवळ तू नवसाला पावतोस या एकाच लालसेपायी तुझ्यासमोर रांग लागते , हे तुला पहावतं तरी कसं ? भारतीय भ्रष्टाचाराचं मूळ असलेली नवसपद्धती तूच पुढे नेत राहशील तर हर्षद मेहतांपासून कलमाडी किँवा कालपर्यंत उघड झालेल्या नावकऱ्‍यांना दोष तरी कसा द्यावा आम्ही ?
जागतिक किर्तीचा अर्थतज्ज्ञ देश चालवत असूनही आमचा रूपया गडगडला आहे . आर्थिक विकास थांबला आहे . FDI चं गाजर चघळूनही गोड लागेलंसं वाटत नाहीय . सत्तेचा डोलारा कधी कोसळेल याचा काही नेम नाही . येणाऱ्‍या काळात आम्ही राजकीय स्थैर्य गमावून बसणार अशी शंका घेण्यासारखं वातावरण आहे .

आमच्या पुण्यनगरीतली चिल्लर पार्टी आधुनिक भारतीय समाजाचं नवं थिल्लर रूप समोर उभं करीत आहे .
मोबाईल , कंप्युटर , इंटरनेटचा वापर भलत्याच भानगडींसाठी करून आमची नवी पिढी स्वातंत्र्याचे ढेकर देत आहे .

ऑलंपिक स्पर्धांत १२१ कोटींमधून ६ माणसं पदक मिळवतात हे मागील इतिहास पाहता अभिमानास्पद वाटत असलं तरी खंडप्राय देशातील खरब खंडीभर जनता बघता लज्जास्पदच नाही काय ?
कालच आमचा क्रिकेट संघ तुझ्या कृपाछत्राखाली खेळूनही चारी मुंड्या चित झाला हे त्यातल्या त्यात ताजं उदाहरण !

बाप्पा ,
कृषी क्षेत्रात , सामाजिक , आर्थिक , राजकीय , क्रीडा , शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात भारत केवळ लोटांगण घेत आहे . जनता तर केव्हाच आडवी झाल्यासारखी वाटतेय .

जाता जाता याकडेही थोडी नजर फिरवून जा रे बाबा  ! ! ! !

तुझाच आंधळा भक्त ,
राजीव .
दि.29/09/2012
मनमोहन सिंग सरकारचा पडतीचा काळ

गाव


कुठे कुडाच्या पोकळ भिंती
कुठे विटांवर ढवळी माती
कुठे छतांवर करडे पाचट
कुठे बडे घर वासे पोचट !

उंबरठ्यावर उभा कुणाच्या
गळफासाचा जुनाच दोर
तरी पंगाड्या शौकीनांच्या
व्याख्यानांना चढतो जोर !

रणरणत्या उन्हात, धसांच्या -
शेती कुणाची पदरं भिजती
पिंपळपारांवरी विड्यांचा
गर्द धूर घेतो विश्रांती !

वक्तृत्वाच्या दाढीवाले
बोकडबुवा यांचे नेते
मेंढरमानी चालत जाती
"नियती", म्हणती, "तिकडे नेते."

साधुत्वाच्या राखेखाली
कुठे धगधगे तृष्ण निखारा
कित्येकांचे पोट रिकामे
मंदीरांचा भरे गाभारा !

कुठे असे अन् कुठे तसे पण
दिसे जरासे जे आपलेपण
दगडालाही घाम फोडते
असले माझ्या गावचे जीवन !

- राजीव मासरूळकर
"मनातल्या पाखरांनो"
rajivmasrulkar@gmail.com

पोटाचे अभंग

।। पोट ।।

खूप साहिलेले
गरीबीचे रोज
तरी आहे बोज
पोटावर ।।

काम आणि राम
डोळे पाही वर
हात पोटावर
ठेवोनिया ।।

आमचेच हात
आम्हा नाही जड
हातांचे दगड
झाले तरी ।।

पोठ आणि पाठ
झाले एकजूट
तरी हरिपाठ
म्हणू आम्ही ।।

कापून भाकरी
बांधले मंदीर
तरीही उंदीर
भिडलेले ।।

कसे विसरावे
पोट एक सत्य
पोटाचे अपत्य
भगवान ।।

- राजीव मासरूळकर
(पुर्वप्रकाशित काव्यसंग्रह "मनातल्या पाखरांनो"मधून)

प्रवाही


तारूण्याला जाळून घ्यावे, नशाच देशी ओतून घ्यावी
प्राचीन अर्वाचीन नी पहिल्या धारेचीही कोळून प्यावी
मुरवून देहामध्ये अस्सल झिंग, मातीला माथा द्यावा
पावित्र्याचा फाडून बुरखा, रंग जिन्याचा जाणून घ्यावा !

कर्तव्यांसह हक्कांचे मुद्देही टांगावे वेशीला
रात्रंदिन झिंगून जपावे सत्य इमानाला शीलाला !
चढता चढता हळूहळू ती उतरत जावी हवी नकोशी
आयुष्याच्या अधोगतीला काळ ठरावा अंतिम दोषी !

थेंब नुरावा बाटलीत अणुरेणूंनी कल्लोळ करावा
दिशाहीन डोळ्यांच्या देखत हातांनाही कंप सुटावा
रेडेवाल्या गुराख्याकडे थेंब मागुनी मिळो न काही
तल्लफ सोडून अगम्यतेच्या मार्गे व्हावे स्वतः प्रवाही !

- राजीव मासरूळकर
दि . ५ सप्टेंबर २०१२
रात्री ९:०० वाजता