सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Monday, 14 September 2020

जीव चरकतो आधी, नंतर गोडी येते

 घोकुन घोकुन कुणास अक्कल थोडी येते

जीव चरकतो आधी, नंतर गोडी येते


उसतोडीचे यंत्र बनवता येऊ शकते

त्या हातांच्या भविष्यात उसतोडी येते


ज्यास जगाचे कठोरपण कळलेले आहे

त्यास निरागस कृष्णाइतकी खोडी येते


दोन चोर राहतात सोबत घरात एका

दोघांपैकी एकाला घरफोडी येते


निष्ठावंतांनी केवळ चाकरी करावी

सत्ता त्याची ज्यास इथे कुरघोडी येते


कार्यमग्न तन, शांत मनाचा सागर ठेवा

ऐलतिरावर भव्य यशाची होडी येते


- राजीव मासरूळकर

  दि.१३/०७/२०२०

  

Sunday, 19 July 2020

मी उन्हाचे चित्र कायम सावलीवर काढतो

दाबतो वाईट खाली चांगली वर काढतो
जन्म अख्खा जन्म एखाद्या सलीवर काढतो

शांततेमध्ये असे सौंदर्य विश्वाचे खरे
ज्यास धरणीकंप प्रिय, तो दंगली वर काढतो

सांग विश्वासार्ह मानावे उजेडाला कसे
आतले काळेच जर तो गोखलीवर काढतो

ज्यास कळते या जगाची साळसुद फसवेगिरी
पीक जन्माचे उभ्या तो दलदलीवर काढतो

रोग दुनियेचा मलाही लागला आहे जणू
मी उन्हाचे चित्र कायम सावलीवर काढतो

- राजीव मासरूळकर
  दि.१९ जुलै, २०२०

Sunday, 7 June 2020

आकड्यांचा खेळ


आकड्यांचा खेळ वाईटच...

आकडे सुरूवातीला आश्चर्याचा धक्का तरी देतात
किंवा घाबरवून तरी सोडतात आपल्याला

काही दिवस बेरीज, वजाबाकी सुरू राहते आलटूनपालटून. धाकधुक चालते क्षणाक्षणाला जिकडेतिकडे. 
मग अधूनमधून गुणाकार व्हायला लागतो.
आकडे फुगायला लागतात.
ते फुगायला लागले की
अक्षरश: भंडावून सोडतात आपल्याला काही दिवस
सुचूच देत नाहीत दुसरं काहीही
कधी आनंदही देतात
तर कधी चिडचिड होत राहते सतत

सरावाने होऊ लागते आकड्यांची सवय
मग भागाकारही व्हायला लागतो आकड्यांचा
लपवाछपवी झाली तरी आपल्याला फरक पडेनासा होतो मग
मग आपण चक्क दुर्लक्षही करायला लागतो आकड्यांकडे
आकडा फुगला काय, रोडावला काय
काहीच वाटत नाही आपल्याला

आकड्यांवरून नजर फिरत राहते,
 पण त्यांचा अर्थ मेंदूपर्यंत पोहोचेनासा होतो
निर्विकार होत जातो आपण आकड्यांच्या बाबतीत
कोरडेठक्क होत जातो
कठोर होतो
मग हादरवून सोडू शकत नाहीत आपल्याला आकडे पुर्वीसारखे
आनंदही देऊ शकत नाहीत

मग चक्क आकडे पाहणंच बंद करून टाकतो आपण
अर्थात आकड्यांमुळे डोकेदुखी वाढू नये
याची पुरेपूर दक्षता घेण्यात सराईत झालेलो असतो आपण

आपण स्वत:साठी, कुटुंबासाठी वेळ काढायला लागतो
जन्ममरण असो, स्थावरजंगम असो,
धंदापाणी असो, भावभावना असो,
पसारा वाढत जातो
आपल्या प्रिय कुटुंबाला
आकड्यांच्या या भीषण खेळापासून
दूर ठेवण्याच्या प्रयत्नातही असतो सतत
तरीही कुठल्यातरी माध्यमातून आलेच आकडे समोर,
तरी ते करू शकत नाहीत आपल्याला विचलित.

आकडे आपली नजर मारून टाकतात
की आपली नजर आकड्यांना मारून टाकते ...
नकळे!

आकड्यांचा खेळ वाईटच!

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि. 5 जून, 2020

Wednesday, 3 June 2020

ङ् , ञ् व त्र

DrVinayak Kapure यांनी त्यांच्या फेसबुक भिंतीवर उपस्थित केलेला प्रश्न असंख्य मराठी अबालवृद्धांच्या मनातला प्रश्न असल्याने तिथे comment म्हणून दिलेलं उत्तर थोडं विस्तृत स्वरूपात सर्वांसाठी इथे देत आहे. (अर्थात मराठीच्या जाणकारांना हे माहित आहेच, तरीही.)

#ङ_ञ_व_त्र

मराठी शिकणा-या, बोलणा-या शालेय वयाच्या बालकापासून पुढच्या कोणत्याही वयोगटातील अनेकजणांना मराठी वर्णमाला पाहिल्यावर एक प्रश्न हमखास पडतो कि हे ङ (वाङ्मय हा अपवाद वगळून) व ञ आपण मराठी लिहिताना कुठेच वापरत नसताना, का बरं वर्ण म्हणून शिकवले जात असावेत? बरं शाळेत यांचं लेखन व वाचनही शिकवणारे शिक्षक विरळाच. कसा उच्चार करायचा यांचा? मग काही जिज्ञासू शिक्षकांचा अपवाद वगळला तर ङ ला ड आणि ञ ला त्र म्हणत शिकवलं जातं. त्या शिक्षकांचासुद्धा तसा दोष नाहीच, कारण त्यांच्या गुरूजींनीही त्यांना असंच शिकवलं असणार. मग काय आहेत ही अक्षरं नक्की?

मराठी वर्णमालेतील व्यंजनांच्या पहिल्या दोन ओळी (वर्ग) अशा आहेत  :
क् ख् ग्  घ् | ङ्    (क वर्ग)
च् छ् ज् झ्  | ञ्    (च वर्ग)

ज्या शब्दात क, ख, ग, घ यापैकी एखादं अक्षर असून त्यांच्याआधी आलेल्या अक्षरावर अनुस्वार असतो, तिथे तो अनुस्वार ङ् असतो. उदा. शंख, अंग, रंग, अंक, अंघोळ, इ. पुर्वी हे शब्द शङ्ख, रङ्ग, अङ्ग, अङ्क, अङ्घोळ असे लिहिले जात. यावरून ङ हा क, ख, ग, घ शी संबंधित अनुनासिक आहे हे यावरून लक्षात येईल व त्याचा नेमका उच्चारही लक्षात आला असेलच.

ज्या शब्दात च, छ, ज, झ यापैकी एखादं अक्षर असून त्यांच्याआधी आलेल्या अक्षरावर अनुस्वार असतो, तिथे तो अनुस्वार ञ असतो. उदा. मंच, अंजीर, मांजा, कंचे, झुंज, , इ.  हे शब्द पूर्वी मञ्च, झुञ्ज, अञ्जीर, माञ्जा, कञ्चे इ. असे लिहिले जात. यावरून ञ हे च, छ, ज, झ शी संबंधित अनुनासिक आहे हे लक्षात येऊन त्याचा नेमका उच्चारही समजला असेलच.

वाङ्मय हा शब्द वाक्+मय (संधी) असा आहे,  त्यात क् चा ङ् झाला  आहे. वाङ्निश्चय सुद्धा तसाच. संधी नसेल, स्वतंत्र वर्ण म्हणून वापर नसेल, केवळ अनुनासिक म्हणून येत असेल अशा ठिकाणी ङ् व ञ् हे टिंब/अनुस्वार म्हणून आधीच्या अक्षरावर येतात.

ञ हा अनुनासिक आहे तर त्र हे त् + र = त्र असं जोडाक्षर आहे. दोन्ही भिन्न अक्षरं आहेत आणि त्यांचा उच्चारही भिन्न आहेत हे आता स्पष्ट झाले असेलच.

मराठीत ङ (क वर्ग), ञ (च वर्ग), ण (ट वर्ग), न (त वर्ग) आणि म (प वर्ग) असे पाच अनुनासिकं आहेत. यातील ण, न व म ही स्वतंत्र अक्षरं म्हणून वापरली जातातच,
पण ङ व ञ प्रमाणेच ते कंठ, कंद, कंप या व अशाच अनेक शब्दांत त्या त्या वर्गातील अक्षरांच्या अगोदरच्या अक्षरांवर अनुस्वाराच्या स्वरूपात विराजमान असतात. क, च, ट, त व प या पाच वर्गांतील अक्षरांआधी येणा-या अनुस्वारांचा उच्चार पाच भिन्न प्रकारे होतो, म्हणून प्रत्येकासाठी भिन्न वर्ण उपयोजिला आहे. भाषेत होणा-या प्रत्येक उच्चारासाठी स्वतंत्र वर्ण असावा असा विचार यामागे आहे. मात्र वरील पाचही वर्गांत नसलेल्या श, स व ह या वर्णांअगोदर आलेल्या अनुस्वाराचा उच्चार  वेगळा आहे हे ही लक्षात घ्यावे. उदा. वंश, कंस, सिंह, इत्यादि.

म्हणूनच, जर मराठी वर्णमालेत ङ व ञ हे वर्ण विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी दिलेले आहेत, तर ते शिक्षकांनी शाळेत वरीलप्रमाणे समजावून सांगायला हवेत. अगदी पहिल्या वर्गातच नको, पण पाचवी किंवा पुढील वर्गातील विद्यार्थ्यांना हे नक्की समजू शकेल. ते समजून सांगायला ग्रंथालयांत उपलब्ध स्वातंत्र्यापूर्वी प्रकाशित किंवा मराठीत अनुस्वाराचे नियम बदलण्यापूर्वी छापलेल्या मराठी पुस्तकांचा वापर करणं शक्य आहे. ते उपलब्ध नसतील तर काही संस्कृत सुभाषितांची मदत नक्कीच घेता येईल.

आता तुम्हाला समजला असेलच, तर शिकवाल ना आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना , आपल्या संपर्कातील सगळ्या मराठी भाषकांना ङ् काय असतो ते?  ञ व त्र मधला फरकही शिकवाल ना?

~ राजीव मासरूळकर
   दि.02 जून, 2020



Monday, 25 May 2020

वारी

दिंडी निघाली आहे पायी
दोनचार कच्च्याबच्च्यांच्या
एकदोन पिकल्या जीवांची पालखी करून
आयुष्याचं वृंदावन डोक्यावर घेत
कोसो दूर...

विटलेल्या लक्तरांच्या असंख्य पताका लोंबकळताहेत क्षीणपणे
स्वत:च्या जात, धर्म, पंथाची ओळख
उघडी पडू नये
याची काळजी घेत

दिंड्या निघाल्याहेत चहुबाजूंनी
अंधाराची, उजेडाची , ऊन, वारा, पावसाची
भुकेचीही तमा न बाळगता
सरकताहेत पुढे पुढे पुढेच
अबीर... गुलाल उधळण्याइतकी शक्ती उरलेली नाहीय
कुठल्याच हातात
मात्र थकल्याभागल्या अवस्थेतही
स्वाभिमानी जिद्दी पाय
तप्त रस्त्यांवर उमटवत आहेत
आत्मनिर्भर रक्ताचे लालबुंद ठसे
काळमार्गावरील मैलाचे दगड ठरत...

दरवर्षी असायचेच हमखास
इथेतिथे खुणावणारे हवेहवेसे मुक्काम
पण यावेळी मात्र रद्द झाले आहेत मधले सगळे मुक्काम
ठरलेल्या एकमेव मुक्कामाकडे
वारी करीत आहे  बेधडक मार्गक्रमण
अधुनमधुन रंगत आहे
श्वासांच्या उभ्या आणि गोल रिंगणांचा अनुपम्य सोहळा
प्राणांचे प्रकाशवेडे अश्व
सजूनधजून उधळत आहेत चौखूर
हे असं रिंगणात उधळणं
म्हणजेच रिंगणातून खरी सुटका...
हे कळून चुकलंय
सगळ्याच अश्राप वारक-यांना

वारीचं हे आगळंवेगळं रूप अनुभवताहेत
वारीचा जिवंत अनुभव नसलेले असंख्य बिचारे लोक
घरबसल्या लोळत आळसावत साग्रसंगीत

ही वारी जातेय एखाद्या गडगंज किर्तीवंत तिर्थक्षेत्राकडे
असं म्हणावं
तर त्यांचे सर्व दरवाजे झालेयत कधीचेच कडेकोट कुलुपबंद...
ही वारी निघालीय
गाव नावाच्या तिर्थक्षेत्रातल्या
घर नावाच्या मंदिराकडे...

वारकरी करताहेत प्रचंड घाई
त्यांना पोहोचवायची आहे आपापली दिंडी
गंतव्यस्थळी वेळेत
गाभा-यातली महापूजा अनुभवण्यासाठी!

मात्र
महापूजा होणार की नाही
झालीच तर करणार कोण
हे काही ठरता ठरत नाहीये....!

~ राजीव मासरूळकर
   दि.25 मे, 2020
   औरंगाबाद

Sunday, 17 May 2020

मोक्ष


कातरवेळ संधी देते
आणि ते आत येतात
भटकभटक भटकतात
जमेल तसं गुणगुणतात
मिळेल तसं पोट भरतात
रात्र बंद करून घेते दरवाजा अचानक
हवा यावी
आणि हवं तेव्हा स्वप्नांचं चांदणंही बघता यावं
म्हणून खिडकी तेवढी ठेवते उघडी
जाळीदार झडप घट्ट लागल्याची खात्री करून घेत.
मग कसलीशी कळ दाबून रात्र जाते झोपी
मग बदलत जाते तिथली हवा क्षणाक्षणाला
अन् गुदमरू लागतो त्या आगंतुकांचा जीव
होऊ लागते प्रचंड दमछाक
भीतीचे महाकाय मेघ दाटून येतात
सुरू होते मार्गांची शोधाशोध
अन् अखंड धावपळ
जाळीवर मारून होतात हजार टकरा
मार्ग तर दिसत असतो स्पष्टपणे
पण भेदता येत नाही काही केल्या
तरीही सुरूच राहतो अविरत संघर्ष
ताजीतवानी होऊन जेव्हा येते पहाट
आल्हाददायक खिडकीत
तेव्हा तिला दिसतात
जाळीला लटकलेले काही किडकिडीत मृतदेह
दिसतात अद्यापही जाळीशी झटत असलेले काही आशावादी जीव
त्यांचे होऊ नये अधिक काळ हाल
म्हणून आपल्या लांबसडक सराईत नाजूक बोटांनी
ती जाळीवरच टाकते त्यांना चिरडून
आणि बघत बसते हतबल जीवांना मोक्ष दिल्याच्या आनंदात
पूर्वेकडून उगवत असलेल्या नव्या सूर्याकडे
लोभसपणे!

राजीव मासरूळकर
दि.17/05/2020
औरंगाबाद

Saturday, 16 May 2020

ती म्हणजे


#लॉकडाऊनमध्ये_आलेला_लॉकअप_डे

ती म्हणजे

प्रेम हक्क अन् त्याग वगैरे ती म्हणजे
एक सुगंधी बाग वगैरे ती म्हणजे

दिवसदिवसभर जरी मला ती आठवते
रात्ररात्रभर जाग वगैरे ती म्हणजे

दोन क्षणांनी सरतो मागे पण येतो
नाकावरचा राग वगैरे ती म्हणजे

श्रावण ओलाचिंब कधी तर कधी शिशिर
रंग उधळता फाग वगैरे ती म्हणजे

ती म्हणजे चाहूल जणू सुख येण्याची
आयुष्याचा माग वगैरे ती म्हणजे

~ राजीव मासरूळकर
    दि.14 मे, 2020
    #लग्नाचा_वाढदिवस_वगैरे

कवी कविता लिहिताहेत

कवी कविता लिहिताहेत
कवी भरमसाठ कविता लिहिताहेत
भरमसाठ कवी भरमसाठ कविता लिहिताहेत
का लिहिताहेत कवी भरमसाठ कविता?

ज्येष्ठ प्रथितयश पुरस्कारप्राप्त साहित्यिक
समाजमाध्यमावर येऊन पाहताहेत
की भरमसाठ कवी भरमसाठ कविता लिहिताहेत
आणि मुख्य म्हणजे तोंड वर करून पुन्हा पुन्हा live सादरीकरण करून का मांडताहेत उच्छाद?
हे हौसेनवसे कवी का इतक्या कविता लिहून बदनाम करीत आहेत कवीकुळाला?
दररोज हजारो लोक किड्यामुंग्यांसारखे मरत असताना
मुकाट आसवं गाळत श्रद्धांजली अर्पण करत बसण्याऐवजी
घरात बसून का लिहिताहेत हे कवी उथळ वगैरे कविता?
या हौशानवश्यांच्या कवितांमुळे
चांगल्या कवितेचं होत असलेलं प्रचंड नुकसान
अस्वस्थ करीत आहे पुरस्कारप्राप्तवगैरे प्रस्थापित साहित्यिकांना..

समीक्षक पडले आहेत भयंकर पेचात
की का लिहित असावेत कवी भरमसाठ कविता?
का लिहिताहेत हे वेडे लोक हातोहात
डॉक्टर्सवर, पोलिसांवर, मजूरांवर, राजकारण्यांवर, दात्यांवर, प्राणीपक्ष्यांवर, निसर्गावर
सर्रास सहजसुलभ कविता?
का करीत आहेत दीर्घकाळापासून घराघरात कोंडलेल्या
हवालदिल हतबल सामान्य रसिकांचं
उठल्याबसल्या live येऊन मोफत मनोरंजन?
या संख्यात्मक वाढीचा किती जबरदस्त फटका बसेल आपल्या अभिजात वगैरे भाषेला?
स्वत:च्या घरात दाळदाणा असो नसो
संकटग्रस्तांना घरोघरी जाऊन मदतीचा हात देण्याऐवजी,
घरात स्वस्थ बसून टीव्हीवर सतत मृत्यूचा सोहळा
निर्विकारपणे बघत बसण्याऐवजी
का लिहिताहेत कवी लोकांच्या वेदनेवर, मरणावर इतक्या कविता?
थांबवायचं तरी कसं या जमेल तसं सरळसरळ लिहित्या हातांना
या प्रश्नाने पार भंडावून सोडलं आहे  काळामागे धावताना प्रचंड दमछाक होत असलेल्या समीक्षकांना

वृत्तपत्र, नियतअनियतकालिकांचे संपादक
विभिन्न प्रकारची पुस्तकं छापणारे प्रकाशक विचारताहेत
की का लिहिताहेत हे भरमसाठ कवी भरमसाठ कविता?
वृत्तपत्र, नियतकालिकं , पुस्तकं घरोघर पोहोचवण्यावर निर्बंध असताना
वाचक मिळण्याची शक्यता नसताना
का विनाकारण लिहिताहेत कवी इतकी सडकछाप कविता?
आम्ही छापतो त्यांची कविता न वाचता
का वाचाव्यात, पहाव्यात संकटग्रस्त रसिकांनी
या हौशानवश्या कवींच्या हलक्याफुलक्या, आक्रोश मांडणा-या, वेदना देणा-या चिल्लर कविता?
समाजमाध्यमांसारख्या आभासी जगात कविता व्हायरल करून
का आपला वेळ आणि उर्जा वाया घालवत आहेत हे असहाय जीव?

कवी स्वत:ही संभ्रमात आहेत
कि का लिहिताहोत आपण इतक्या कविता?
शक्य तितकी मदत केली
शक्य त्यांना आधार दिला
शक्य तितका ब्रेकिंग न्युजचा भडिमार सोसला
शक्य तितकं गुपचूप गुदमरत बसलोत घरात
सगळं जग घरात बसलेलं असतानाही
का घडताहेत बाहेर या प्रचंड हालचाली?
का जाताहेत हकनाक असंख्य निष्पाप जीवांचे बळी?
का पसरलं आहे घराघरांवर मृत्यच्या भयाचं सावट?
का नाही थांबत आपली वेदनादायी विचारप्रक्रिया?
का आपलं हळवं मन प्रवृत्त करतंय आपल्याला वारंवार
कविता लिहायला?
याच विचारचक्रातून कवी पुन्हा लिहायला बसले आहेत कविता
आणि कदाचित विचार करताहेत पुन्हा live येऊन
आपण अद्यापही जीवंत असल्याचा पुरावा देत
चारचौघांना जीवंत असल्याचा अनुभव देण्याघेण्याचा

सध्या सर्वत्र एकच जोरदार चर्चा आहे
की कवी भरमसाठ कविता लिहिताहेत.

~ राजीव मासरूळकर

Monday, 11 May 2020

सामना


अखेर
रंगला आहे
पोट आणि मृत्यू यांच्यात
एक अटीतटीचा अंतिम सामना

सामना...
घास मिळवण्याचा!

सामन्याने गाठले आहे
इतके रोमांचक शिखर की
पंचही विसरून गेले आहेत स्पर्धेचे कडेकोट नियम
आणि बघत बसले आहेत बेभान होऊन
कोण कुणाचा घास घेतो ते...

गोंधळभरल्या कोलाहलाच्या चित्कारांत
विरून गेले आहेत निस्तेज आवाज
फाऊल.. हाऊज दॅट आणि निषेधांचेही

मनात असीम उत्कंठा ठेवून
प्रचंड अस्थिरतेचा प्रेक्षक होत
मी ही बसलेलोच आहे
सामन्याच्या अंतिम क्षणाचा आस्वाद घेण्यासाठी
अधाशासारखाच...!

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि.11 मे, 2020

Wednesday, 6 May 2020

कवी


कवी कसा दिसतो हे कुणालाच माहित नाही
कवी शोधूनही अगदी कुठेच सापडत नाही
त्याच्या पत्त्यावरही सापडत नाही त्याचं घर
तिथे सापडतात फक्त
त्याच्या चुकल्याहुकल्या फेकून दिलेल्या काही निष्पाप ओळी
सापडतो एखादा पाळीव प्राणी
त्याने आधीच त्यागलेल्या पाळीव इच्छांचं पालन करणारा
एखादवेळी सापडू शकते
कविता लिहिण्यात मग्न कवीकडे
तासन् तास मुग्धपणे पाहत बसणारी
त्याची लुब्ध प्रेयसी
खरं सांगायचं तर तिलाही कवी कधीच सापडलेला नसतो
कवी कसा दिसतो हे तिलाही माहित नाहीच
कवीच्या घरात
कवी राहत असल्याच्या इतर कुठल्याच खाणाखुणा नाहीत
दारावर एखादी चमकदार पाटीही डकवलेली नाहीय
त्याच्या रुबाबदार वगैरे नावाची

कुठल्याच कार्यालयात उपलब्ध नाही
कवीच्या जन्माचा दाखला

ही कविता त्यानेच लिहिली आहे
कि कुणी खपवली आहे त्याच्या नावावर
स्वत:चे विचार घराघरात पोहोचवण्याच्या उदात्त हेतूने
नकळे

की
हा कवी
आणि त्याची ही कविता
निव्वळ एक थापच आहे?

~ राजीव मासरूळकर
   दि.06/05/2020
   औरंगाबाद

Saturday, 2 May 2020

घोषणा


त्यांनी सांगितलं
भूकंपाचे झटके जाणवले की लगेच घराबाहेर पडा
मी घराबाहेर पडून मोकळ्या जागी आलो

त्यांनी सांगितलं
समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळणार आहेत
मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये
मी टाकला माझ्या बोटीचा नांगर
अन् सुरक्षित पोहोचलो किना-यावर

त्यांनी सांगितलं
त्सुनामी येणार आहे
समुद्रकिना-यावरची सगळी गावं रिकामी करा
मी समुद्रकिना-यापासून कोसो दूर असलेल्या
माझ्या मूळ गावी जाऊन
सुरक्षित जगू लागलो

त्यांनी सांगितलं
तुमच्या शहरात शिरला आहे भयावह कोरोनाव्हायरस
शहराच्या सर्व सीमा बंद करून
घोषीत केली गेलीय कडकडीत टाळेबंदी
मुळीच घराबाहेर पडू नका
मी माझा इवलासा पापभिरू जीव मुठीत धरून
शहरातल्या घरातच
दबा धरून बसलो आहे....

आता
मला राहून राहून आठवण येतेय
भूकंप, वादळ, त्सुनामीवेळच्या
कल्याणकारी करूणामय घोषणांची !

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि.02/05/2020

Friday, 1 May 2020

पैलू

खोदू लेण्या मंदिर बांधू
ताजमहल अन् स्तूप उभारू
पिरॅमीड ते बुर्ज खलिफा
चढवू मजले, पुट्टी मारू

उचलू ओझे मारू रंधा
लावूनिया खांद्याला खांदा
जगास अवघ्या पैलू पाडू
खात भाकरी चटणी कांदा

डोंगर फोडू काढू रस्ता
वेचू कापुस, बनवू गाठी
यंत्र चालवू, नाल्या काढू
होत मायबाबाची काठी

करू इमानेइतबारे जे
मालक सांगे दमदाटीने
हलगर्जी वा चूक एकही
रस्ता घरचा मत्त सहीने

हातावरचे पोट आपले
डोक्यावर संसारगठोडे
जमेल तितके सहन करू पण
अति झाले तर लावू घोडे

काळ परीक्षा घेत राहतो
बनू संयमी हिंमत दावू
येणारे युग अपुले आहे
मन, मेंदू परजूया बाहू

~ राजीव मासरूळकर
   दि.01/05/2020
  

Thursday, 30 April 2020

खिडकी

खिडकी

विरंगुळा जगण्याचा आहे झाली खिडकी
विश्व नव्या इच्छांचे  साजुक व्याली खिडकी

देहाचे डोळे करतो अन् पाहत बसतो
चेटुक ओठांवरची दाहक लाली खिडकी

थेट नभाच्या घरातही डोकवता येते
खिडकीमध्ये खिडक्या घेउन आली खिडकी

रस्त्यावरचा मधाळ वारा खुणावतो, मग
लाजत लाजत हसू फुलवते गाली खिडकी

सूर गोडवा गंध गारवा सळसळ कातर
देत कवडसा सुखात एकट न्हाली खिडकी

क्षण दु:खाचे किती पचवले एकांती अन्
दबली आनंदाच्या ओझ्याखाली खिडकी

लग्न प्रेयसीसोबत झाले त्या घरट्याचे
म्हणून दिसते प्रसन्न त्याची साली खिडकी

झाली तर होऊ दे सगळी बंद कवाडे
एक असावी उघडी पण भवताली खिडकी

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि.30/04/2020

Wednesday, 29 April 2020

चंगळ

चंगळ

सुरूवातीचे काही दिवस
सहस्त्राक्ष अन् लक्षकर्ण होत
आम्ही चिकटून बसलो टीव्हीला
ब्रेकिंग न्युज झाल्यासारखेेच
मग व्हाट्सॅप, फेसबुक, युट्युब, टिकटॉक, इंस्टाग्रामवर
आळीपाळीने उड्या मारत
टाईमपास केला यथेच्छ
टाळ्या वाजवल्या, दिवे लावले, प्रार्थना केल्या
पुन्हापुन्हा किराणा भरला
पुन्हापुन्हा भाजीपाला आणला
व्यायामही केला जमेल तसा
साऊथ, बॉलीवूड, हॉलीवूडचे
अंगांगांगांगावर चालून येणारे
रग्गड सिनेमे बघितले
नेटफ्लिक्सवरच्या वेबसिरीज बघत
रियाज केला स्वत:तल्या क्रौर्याचा
रात्रंदिवस जमेल तशी
संधी साधत
कधी कंटाळलेल्या जीवनसाथीसोबत
तर ब-याचदा पोर्नस्वर्गसाईट्सवर
मिळवला हवाहवासा अघोरी ऑरगॅझम
गच्चीवर जाऊन न्याहाळल्या
इतरांच्या गच्चीवरल्या चुकचुकत्या चांदण्या
घरात मुद्दाम साठवून ठेवलेला
ईश्वरीय अमृतकुंभ संपवत
झिंगत राहिलोत काही दिवस
रात्रीबेरात्री गुपचूप घराबाहेर पडत
अधाशासारख्या फुंकल्या फकाफक सिगरेटी
एकदोनदा पार्श्वभागावर बसली जादूची कांडी
डोळ्यांसमोर प्रकटले
लक्षावधी लखलखते विषाणू
मग घरात असल्यानसल्या पुस्तकांत डोकं खुपसून बसलो
पोरांसोबत खेळत बसलो
चेस, कॅरम, चंफूल, पत्ते, अंताक्षरीसारखे पोरखेळ
आखाजीदिवाळीला करतात तशी
लखलखीत साफसफाई केली घराची
स्वत:च स्वत:च्या बटा (आय मीन जटा) सावरत
घोटून घोटून केला चकचकीत गोटा
गुळमुळीत कविता लिहिल्या,
आंबटचिंबट व्हिडीओज केले
चटकमटक पदार्थ बनवून खाल्ले
काही नव्याने शिकून घेतले
आदळआपट करत भांडी घासली
मरणयातना सोसत पायपीट करणा-या
बेघर मजुरांसाठी कळवळलो
ऋतूंचा द्रोह सोसणा-या
हतबल शेतक-यांसाठी अश्रू ढाळले
एका आदिम टोळीचेे आजीव सदस्य होऊन
दुस-या आदिम टोळीला शिव्या हासडल्या
सगळंसगळं केलं
अगदी भक्तीभावानं
आलटूनपालटून
उततमातत

तरीसुद्धा
मनमेंदूच्या सर्वशक्तिमान गारूडावर
फिरूनफिरून घिरट्या घालतच आहेत
भीती, नैराश्य, कंटाळा, वैफल्य, वैराग्याचे
थवेच्या थवे...

काम नाकारलेल्यांच्या
बेघरांच्या रांगेत
रहावं लागलं असतं आपल्यालाही उभं
तर.....?

किती दिवस करता येईल
अशी खाण्यापिण्याजगण्याभोगण्याची
परावलंबी चंगळ ...?

म्हणून
सतत जीवघेण्या संकटांच्या युद्धजन्य जबड्यात
अडकत चाललेल्या
वर्तमानांकित भविष्यात
हे बिचारं वैफल्यविषाणुग्रस्त हळवं मन
रमवावं तरी कसं
हा एकच प्रश्न
मला भंडावून सोडतोय.

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि.29/04/2020

Monday, 27 April 2020

सत्य



मी शोध घेत राहिलो
वारंवार शोध घेत राहिलो

अन् सापडल्या फक्त दोनच गोष्टी...

एक  :
देव नाही
म्हणून हे जग इतकं क्रूर आहे.

दोन  :
देव आहे
आणि तो खूप क्रूर आहे...!

~ राजीव मासरूळकर
    औरंगाबाद

Tuesday, 21 April 2020

चेहरा माझा खरा नाही दिसत ना?

गझल

पाहिजे आहे तसे नाही मिळत ना
जग तुम्ही आहे तसे आहे विकत ना?

फक्त दिसतो मीच सोशल मीडियावर
चेहरा माझा खरा नाही दिसत ना?

जायचे आहे घराबाहेर थोडे
पाय तुमचाही तरी नाही निघत ना?

मी कशी ही भूक मिटवावी स्वत:ची
आग आहे आग ही नाही विझत ना

हात कोणाच्या कसा हातात देऊ
व्हायरस देहातला नाही दिसत ना

श्वापदांना झोप सध्या येत नाही
माणसांचा प्लॅन तर नाही शिजत ना?

एक येते साथ आणिक जग बदलते
जग तसे स्वत: कधी नाही शिकत ना

काळजी घेतील रस्ते यापुढे ही
माणसे रस्त्यावरी नाही फिरत ना?

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि.21/04/2020

तो म्हणाला

तो म्हणाला,
जगावरचं हे संकट टळलं की
सगळं काही ठीक होईल.
मी म्हणालो, काय ठीक होईल?
तो म्हणाला, हे जे गरीब आहेत ना,
ते गरीब राहतील अन् हे श्रीमंत श्रीमंतच.

★  ★  ★

मी म्हणालो, पण हा सगळा खटाटोप कशासाठी?
तो म्हणाला, गरीबांना जगवण्यासाठी.
मी पुन्हा म्हणालो, पण गरीबांना का जगवायचं?
तर तो गंभीर होत म्हणाला, मग हे श्रीमंत कसे जगू शकतील?

★  ★  ★

तो म्हणाला, गरिबांचा विकास झाला पाहिजे.
मी म्हणालो, त्याने काय होईल?
तो म्हणाला, बाजार वाढेल.
मी पुन्हा म्हणालो, त्याने काय होईल?
तो छाती फुगवत म्हणाला, श्रीमंत आणखी श्रीमंत होतील.

★  ★  ★

मी म्हणालो, हे बिचारे गरीब
पिढ्यान् पिढ्या गरीबच का आहेत?
तो म्हणाला, त्यांना श्रीमंत होता येत नाही म्हणून.
मी कळवळून म्हणालो, त्यांना श्रीमंत कसं होता येईल?
तर तो हसत हसत म्हणाला,
ते गरीबांनाच श्रीमंत करू लागतील, तेव्हाच.

★  ★  ★

~ राजीव मासरूळकर

Saturday, 18 April 2020

क(रो)णा : विडंबन

(कुसुमाग्रजांची क्षमा मागून) विडंबन

क(रो)णा

'ओळखलंत का सर मला', दारात आला कोणी
कपडे नव्हते अंगावरती, होते डोळ्यांत पाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
'रस्त्यांवरती कुणीच नाही, सगळेच घरात काहून;
घरजावयासारखा भारतात आलो, मनासारखा नाचलो
मोदीजींनी लॉकडाउन केलं- एकटाच रस्त्यावर वाचलो
मंदिर गेले, मस्जिद गेले, बियर बार बंद झाले
प्रसाद म्हणून पोलिसांहाती दंडे तेवढे ठेवले
धर्म, राजकारण घेऊन संगे सर, आता लढतो आहे
भाजीबाजार हिंडतो आहे, बागेत प्रेमी शोधतो आहे.'

डेटॉलकडे हात जाताच हसत हसत उठला
'औषध नको सर, जरा एकटेपणा वाटला-
मोडला तुमचा संसार तरी मोडला नाही कणा
हृदयावरती कोरुन ठेवा फक्त न् फक्त करोणा.'

~ राजीव मासरूळकर
    दि.18/04/2020

किती तरी दिवसांत : विडंबन


(कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांची माफी मागून)

किती तरी दिवसांत
नाही रस्त्यावर गेलो
किती तरी दिवसांत
नाही उन्हात नहालो

खुल्या रस्त्यांची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि कोवळ्या उन्हाची
ऊब ओळखीची तीच

केव्हा तरी रस्त्यावर
पुन्हा जाईन निर्भय
शहरातल्या गर्दीत
होईन मी गर्दीमय

आज अंतरात भीती
खुळ्या कोरोनाची थोडी
आणि बाहेर पोलिस
अंगावर काठी तोडी

बरा म्हणून हा इथे
टुबीएचकेचा फ्लॅट
बरी न्यूजचॅनलची
जीवघेणी वटवट!

~ राजीव मासरूळकर

Friday, 17 April 2020

वैफल्यग्रस्त वर्तमानाचं मौन


डोक्यावर अळ्या पडलेली किळसवाणी जखम घेऊन
पिसाळल्या कुत्र्यागत किंचाळत
दिशाहिन फिरत असलेलं हे अतिरेकी वर्तमान
पकडता येत नाहीये मला शब्दात

मला अर्थ लावता येत नाहीये
एकाच वेळी
आपल्या लाडक्या मनुष्यप्राण्यासह
सगळं अस्तित्वच गिळंकृत करण्यासाठी
सतत आ वासून सज्ज असलेल्या
या अथांग भयावह विश्वाला
लिलया जन्माला घालणारे तथाकथित असंबद्ध ईश्वर
आणि
अवघं विश्वच एका क्षणात पायदळी तुडवण्यासही मागेपुढे न पाहणारी
स्वयंघोषित सर्वश्रेष्ठ बुद्धिमान उन्मादी मानवजात
का झाले आहेत आपापल्या
अत्यंत असुरक्षित तकलादू मातीमय बिळांत कुलूपबंद?

मी थकून गेलोय
समाज व सामाजिक या ऐतिहासिक युद्धखोर शब्दांचं
शवविच्छेदन करून करून
पण सापडू शकलेला नाहीय मला
त्याचा कालनियोजित आदीमोत्तर भविष्यवाही डीएनए

घराविषयीच्या काहुरभरल्या भयगंड भावनांचं
मनात उधानलेलं एकाकी हळवं वादळ
पोटातल्या जालिम जीवघेण्या आगडोंबावर मात करत
का निघालं असावं अनवाणी पायांनी
हजारो मैलांचं सामाजिक अंतर कापत...?
कुणी का कापले असतील इतक्या क्रुरपणे
हे सुंदर कुशल निर्मितीक्षम हात
एकाच अघोरी घावात....?
असे प्रश्न सध्या माझ्या मुर्दाड मनाला
आपलेपणानं स्पर्शही करू शकत नाहीयेत

हे  मास्क, सॅनिटायझर, लॉकडाऊन, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग, वगैरे वगैरे...
ही शाब्दिक दहशत का लादू पाहतेय
ऐतिहासिक गुलामगिरीतून नुकत्याच सावरलेल्या
माझ्या वैचारिक पंखफुटल्या समाजमनावर
एक अत्याधुनिक अस्पृश्यता....

माझ्या डोळ्यांसमोर पसरलाय इतका भयग्रस्त लख्ख प्रकाश
की मला दिसू शकत नाहीये
शेतावरून अमानुष यंत्र फिरलेल्या
लसलसत्या भाजीपाल्याचं हिरवं रक्त
आणि रस्त्यावर बेमौत चिरडल्या गेलेल्या
टंच टरबुजांचे लालभडक आगतिक अश्रू...

या निरस होत चाललेल्या बेचव जगण्याच्या
अळणी कविता लिहून
कुठली क्रांती घडवून आणणार आहे
माझ्यातला समाजवेडा कवी...?

एका अदृष्य विषाणूच्या दहशतीखाली
आपल्या प्रिय व्यक्तीला स्पर्श करून
प्रेम व्यक्त करायलाही घाबरणारा,
शहराच्या गल्लीबोळांतून गुरं  कोंबावीत तशी लेकरं कोंबून
अनेक पिवळ्याधम्मक स्कुलबसेसमधून गोळा करून
एकेका बेंचवर तीन तीन लेकरं बसवत
इंटरनॅशनल ज्ञान देणा-या महागड्या शहरी शाळेत
आपल्या लेकराला कसं पाठवावं
या विवंचनेत असलेला माझ्यातला भेदरलेला कवी
कसं लिहू शकणार आहे
नव्या युगाच्या स्वागताचं जाज्वल्य क्रांतिगीत....?

पण
क्रांतीबीज तर कधीचंच रूजत घातलं गेलंय मनामनात
आता कोणत्याही क्षणी फुटू शकतील त्याला
मानवतामुलक नवतेचे लुसलुशीत कोंब
हे अगम्य कालजेय ऋतुचक्रा, माझा हा भाबडा आशावाद खरा ठरव....!
या वैफल्यग्रस्त वर्तमानाचं मौनव्रत सोडवून
नव्या ऐक्यमय भविष्याची तुतारी फुंकण्याची
हीच तर योग्य वेळ आहे....!

~ राजीव मासरूळकर
    दि.17/04/2020
    औरंगाबाद

Wednesday, 15 April 2020

वेढा

आम्ही गडावर आहोत
एवढे दिवस गडावरच काढावे लागतील असं वाटलं नव्हतं
गनिम मोठ्या फौजेसह आमच्याकडे चालून येत आहे
ही बातमी लागताच
आम्ही आमच्या अभेद्य गडावर सुरक्षित पोहोचलोत
आमच्या हेरांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच
पण फितुरी काही कमी नाहीय आमच्या राज्यात
आम्हाला गडावरून सोडवण्यासाठी
असंख्य मावळे लावताहेत प्राणाची बाजी
कित्येक पडताहेत धारातिर्थी
पण काळाचं भान अन् परिस्थितीची जाण नसलेले
हे अज्ञानी फितूर उठले आहेत आमच्या मुळावर
आणि आता गनिम हजाराचे पाच लाख होऊन
घालत आहे गडाला वेढा
मावळे देतायत कडवी झुंज
करताहेत जखमींवर उपचार
घालताहेत बेघरांच्या तोंडी दोन घास
शोधताहेत गनिमी काव्याचे नवे मार्ग
फंदफितुरीच्या नादात रस्त्यावर उतरलेल्यांना
लावताहेत परतवून
पण
जीवनावश्यक चिरीमिरीच्या मोहात पडून
रयत अडकतच चाललीय गनिमाच्या जाळ्यात
धारातिर्थी पडलेल्यांच्या प्रेतांचा खच पडायला सुरूवात होतेय
गनिमाच्या धाकाने देता येत नाहीय
आपल्यांनाच मूठमाती
गडावरील जनता हवालदिल होत चाललीय दिवसेंदिवस
पण आम्ही हरलेलो नाहीयोत अजून
आम्ही स्वत: दक्ष आहोत
रयतेला सांगताहोत दक्षता घ्यायला
गडावर राहून का होईना पुरवतो आहोत आवश्यक ती रसद
गरजू युद्धग्रस्तांपर्यंत
आणि मुख्य म्हणजे वाढवतो आहोत त्यांचं मनोबल
जमेल त्या पद्धतीनं...

तरीही
धर्म, राजकारण आणि विनाकारण फिरणारे फितुर
यांच्यापुढे आम्ही होत आहोत हतबल
या हतबलतेनं आमच्या अभेद्य गडाचाही
उडतोय थरकाप
पण आम्ही घाबरणारे नाहीयोत...

लढाई सुरूच आहे
आम्ही जिंकून दाखवूच.....!

~ राजीव मासरूळकर
    औरंगाबाद
    दि.15/04/2020



Saturday, 11 April 2020

भयंकराच्या पलिकडे

भयंकराच्या पलिकडे
असू शकतं महाभयंकर
अन् अलिकडे
सुंदर

महाभयंकराच्याही पलिकडे
असू शकतं अतिसुंदर
अन् अलिकडे
भयंकर

आपण कुठे उभे आहोत
इतकंच शोध
अन् कामाला लाग.

~ राजीव मासरूळकर
    दि.10/04/2020

Saturday, 4 April 2020

पेराल तेच उगवेल

             लॉकडाऊनमुळं संपूर्ण भारत घराघरात कोंडला गेला आहे. शाळा-महाविद्यालयं बंद असल्यानं औपचारिक शिक्षण बंद आहे, परंतु अनौपचारिक शिक्षण अव्याहत सुरू आहे. भारतातील अंदाजे 75% कुटुंबांकडे टीव्ही आहेत. फेब्रवारी 2020 च्या एका अहवालानुसार भारतातील सुमारे 40 कोटी लोक whats app वापरतात. सुमारे तेवढेच लोक फेसबुक वापरतात. ग्रामीण भागातील सुमारे 90% कुटुंबांकडे मोबाईल फोन्स आहेत. यावरून असं म्हणता येतं की 0 ते 6 वयोगटातील बालकं (सुमारे 10 ते 15%%) वगळली तर उर्वरीत 85 ते 90% जनता घरात (अत्यावश्यक सेवेतील लोक घराबाहेर वेळ मिळेल तेव्हा) टीव्हीवरील न्युज चॅनल्स पाहून, व्हाट्सॅप-फेसबुकवर वाचून, चर्चेत सहभागी होऊन, 6 ते 18 वयोगटातील मुलं बातम्या पाहून, घरातील चर्चा ऐकून- चर्चेत सहभागी होऊन देशातील एकूणच परिस्थितीबाबत माहितीचं देवाणघेवाण करत आहेत, आपापली मतं बनवत आहेत. दुस-या शब्दांत सांगायचं तर भारतातील सुमारे 85 ते 90% मेंदुंचं वैचारिक/बौद्धिक पोषण सध्या मिडीया व सोशल मिडीयाच्या माध्यमातून होत आहे. (वाचन व तत्सम बाबींचा अपवाद आहेच.)
                पेराल तेच उगवेल ही म्हण माणसांच्या बाबतीतही 100% लागू पडतेच हे कुणीही अमान्य करणार नाही. म्हणूनच लॉकडाऊनच्या या चिंताग्रस्त काळात औपचारिक शिक्षण बंद असल्यामुळं अनौपचारिक शिक्षण देणा-या पालक, मिडीया व सोशल मिडीयाची जबाबदारी किती वाढली आहे हे लक्षात येईल. या काळात  मनामनावर जे जे बिंबवलं जाईल, ते ते मनात घट्ट बसून कोरोनासंकट निवळल्यावर विचार म्हणून, संस्कार म्हणून आज घरात बसलेल्या 6 वर्षाच्या शिक्षणक्षम बालकांपासून वयोवृद्धांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहू शकतं. या काळात घडणा-या घटना, झडणा-या चर्चा गांभिर्यपूर्वक ऐकणा-यांपैकी  किमान 50% लोकांच्या मनाततरी त्या कायम घर करून राहण्याची शक्यता आहेच आणि त्याचा सर्वांच्या भविष्यावर काहीएक परिणाम निश्चितच होणार आहे.
                ही शक्यता जर खरी वाटत असेल तर सर्वांना यावर गांभिर्यपूर्वक विचार करण्याची गरज आहे हे मला सांगायचं आहे. मिडीयापर्सन्सनी व सोशल मिडीया वापरकर्त्यांनी, पालकांनी बातम्या, घटना, घोषणा, इत्यादीबाबत तर्कशुद्ध विचार करूनच, खात्री करूनच चर्चा करावी. घराघरातल्या बालकांच्या, युवकांच्या मनात कुणाविषयीही द्वेष निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. कोरोनासारखी संकटं
येतील, जातील, पण भारतासारख्या खंडप्राय देशाच्या ऐक्यासाठी संकट निवळल्यावरही शांततामय जनजीवनासाठी आताच काळजी घेणं महत्त्वाचं आहे हे नाकारून कसं चालेल?

(आणि हो, कोरोनाचं जागतिक संकट निवळल्यानंतर संपूर्ण जगाला जणू नवजीवन प्राप्त होणार आहे. नवं युगच अवतरणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातील आपल्या राजकीय भूमिका भावी नवयुगावर नव्या संकटाचं सावट निर्माण करणार नाही यावर विचारमंथन होणंही अतिआवश्यकच.)

~ राजीव मासरूळकर

Thursday, 2 April 2020

विंचू आपण


जरी न लिंबूटिंबू आपण
सागरातले बिंदू आपण

युद्ध आपले सुरू स्वत:शी
ठेवू संयम, जिंकू आपण

इतरांचा का ठेका घ्यावा
स्वत: स्वत:ला निंदू आपण

माणसास, धरतीला डसतो
भुजंग आपण विंचू आपण

एकांतातच पटते ओळख
शोधू अत्तर, शिंपू आपण

~ राजीव मासरूळकर

Tuesday, 31 March 2020

कोरोनाच्या सावटाखालचं सैरभैर जग

कोरोनाच्या सावटाखालचं सैरभैर जग

मी घरातच आहे.
मी निस्सीम देशभक्त होण्याचा भाबडा प्रयत्न करत आहे.

मी उठतो. बसतो. चालतो. डोलतो. कधी गादीवर, कधी सोफ्यावर लोळतो.
कित्तीही कंटाळा आला तरीही घराबाहेर पाऊल टाकत नाही.
मी टीव्ही लावतो. (त्यासाठी बायको व मुलांसोबत लढावं लागलेलं असतं.) न्युज चॅनलवरचा ब्रेकिंग न्युजचा भडिमार बघतो. राज्याचे, देशाचे, जगाचे कोरोनाबाधितांचे वाढते आकडे बघून घाबरतो. मला सोफ्यावरून खाली उतरावसं वाटत नाही. मी चॅनल बदलत राहतो. भाजीपाल्यासाठी, किराण्यासाठी गर्दी करणा-या, सकाळी मॉर्निंग वॉककरता बाहेर पडलेल्यांचा, घरात करमत नाही म्हणून सहज फेरफटका मारायला म्हणून गर्दी करणा-यांचा, मुंबईपुण्यात कोरोना वाढण्याच्या भीतीपोटी स्वत:ची गाडी घेऊन किंवा ओला-उबर मागवून खेड्याकडे निघालेल्या येड्यांचा मला जाम राग येतो. सोज्वल शिव्या हासडत मी कुस बदलतो. चॅनल बदलतो. ब्रेकमध्ये 20 सेकंदात हात धुण्याची सूचना आल्याबरोबर बेसिनकडे पळतो. हातावर डेटॉल घेऊन Suman M पद्धतीनं हात धुतो. सकाळपासून ओल्याच असलेल्या टॉवेलला पुन्हा हात पुसतो आणि टीव्हीसमोर येऊन बसतो. एखादा चित्रपट लावतो. गढून जातो त्यात. हसतो. खोकतो. नाक ओढतो. बोटांनी नाक साफ करतो. हाताकडे बघतो. घसाही खरखर करतोय. कपाळाला हात लावून बघतो. आपल्याला कोरोना तर झाला नाही ना? चिंताक्रांत होतो. बेसिनकडे धावतो. हात धुतो. नाक धुतो. पुन्हा हात धुतो. हात नाक टॉवेलला पुसतो. नाकही त्याच टॉवेलला पुसले म्हणून पुन्हा हात धुतो. हात पुन्हा त्याच टॉवेलला न पुसता घातलेल्या बर्मुडा चड्डीला पुसतो. टीव्हीसमोर येऊन बसत नाही तोच नाक गळतंय की काय असं जाणवतं. अंगठा व तर्जनीनं नाकपुडीतून काही बाहेर येतंय का ते तपासतो. फिक्कट पिवळा शेंबूड बोटांना लागतो. तो तसाच दोन्ही बोटांनी कुस्करतो. घट्ट होऊन त्याची लेंडी झाली की तशीच अंगठ्यावर घेऊन तर्जनीनं भिरकावतो. तितक्यात हात धुवायचा ब्रेक येतो. पुन्हा बेसिनकडे पळतो. मग मला आठवतं आपण नियोजनपूर्वक महिनाभराचं मेडिसीन व किराणा भरल्याचं. मी सर्दीची एक गोळी घेतो. एक चमचा कफसिरप घेतो. स्वत:ची तारिफ करत पुन्हा सोफ्यात बसतो. टीव्ही बोर झालेली असते. मग मी मोबाईल काढतो. Whats app वर क्लिक करतो. चीनमध्ये इतके, इटलीत तितके लोक मेल्याच्या, खबरदारी घ्यायला सांगणा-या पोस्ट वाचतो. घरात बसणारांवरचे, बाहेर पोलिसांचे फटके खाणारांवरचे , नवराबायकोवरचे विनोद वाचतो. हसतोही. मग इटलीतून मराठी माणसाचा मराठी माणसांना घरातच बसा म्हणून कळकळीची विनंती करणारा भीतीदायक व्हिडीओ पाहतो. आपण कोरोनानं मेलो आहोत आणि आपलं प्रेत उचलायलाही कोणी उरलेलं नाही असं दृश्य डोळ्यांसमोर येऊन मी थरथरायला लागतो. जवळच्या लोकांच्या चारपाच ग्रुपवर तो व्हिडीओ पाठवून मी त्यांना सतर्क करतो आणि न्युज चॅनल लावतो. लोक घराबाहेर फिरतच आहेत, पोलिस त्यांच्यामागे धावताहेत, ढुंगणावर फटके देताहेत असे मनोरंजक दृष्य पाहत बसतो. मग राज्याचे आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री मिडीयासमोर येतात. राज्यात किती रूग्ण दाखल आहेत, काय काळजी घेतली जात आहे, जनतेने काय दक्षता घ्यावी याबाबत माहिती देतात. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देतात. ब्रेकिंग न्युजचा भडिमार सुरू राहतो. मला आठवतं टीव्ही मोबाईल पाहताना मी अनेकवेळा नाकाला, चड्डीला हात लावलाय. घशातली खरखर वाढत चाललीय. आता आपलं काही खरं नाही म्हणत पुन्हा बेसिनकडे पळतो. कफसिरप काम करत नाही तर मग काय करावं? बायकोला सांगावं का? नाही नकोच. तिची आवडती मालिका न लावता टीव्हीच्या रिमोटचा ताबा आपणच घेऊन अत्यंत निरंकुशपणे तिची इच्छा चिरडल्याच्या रागानं ती बेडवर जाऊन झोपलीय. नकोच तिला सांगणं म्हणत मी किचनकडे वळतो. मीठाच्या कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्या म्हणून लाईटरनं गॅस पेटवतो. हँडल ओढून किचनट्रॉलीतून छोटं पातेलं काढून गॅसवर ठेवतो. प्युअरेटच्या नळाची तोटी वर करून ग्लासभर पाणी घेऊन पातेल्यात ओततो.  हँडल ओढत अलमारीतून मिठाचा डबा काढतो. चुकटीदोन चुकटी मिठ पातेल्यातल्या पाण्यात टाकतो. पुन्हा किचनट्रॉलीतून चमचा काढण्यासाठी हँडल ओढताना लक्षात येतं की बाप रे! किती वस्तुंना हात लावला आपण? यांच्यावर आधीच कोरोना विषाणू बसलेला असेल तर? बायको फार काही काळजी घेत नाही आपली. बोललं की अंगावर धावून येते अन् तुम्हीच का नाही करत म्हणून टोमणेही मारते. तिच्या हातावरूनही विषाणू या हँडल्सवर बसू शकतो. अरे हो... हे पाणी गरम करण्याच्या नादात मी नाकातोंडाला कितीवेळा हात लावला? बापरे... चिंता खायला लागते. मी किचनओट्याशेजारच्या नळाखाली हात धुतो. ट्रॉलीतून सांडस घेऊन गॅस बंद करत पातेल्यातलं पाणी ग्लासात ओततो. गॅलरीत जाऊन इकडेतिकडे बघत गुळण्या करतो. किती मोकळी हवा आहे बाहेर! अहाहा! व्वा... एकदा यावं का बाहेर फेरफटका मारून?  पाच वाजलेत. ऊनही उतरलं. किती लोक फिरताहेत बिनबोभाट बाहेर? आपणच काय कुणाचं घोडं मारणार आहोत असा विचार करत  रूमालाला हात पुसतो. कोरोनाचा विचार पिच्छा सोडत नाही हे लक्षात घेऊन रूमालासह हॉलमध्ये येऊन पुन्हा सोफ्यात बसतो. मोबाईलवर फेसबुक उघडतो. सगळीकडे करोनाच करोना. करोनावरच्या विनोदी पोस्ट, कविता, घराबाहेर पडणारांना मुर्खात काढून शिव्या हासडत परिस्थितीचं गांभिर्य समजावून सांगत घरातच गपगुमान बसण्याची धमकीवजा विनंती करणा-या पोस्ट्स, मोदीचं गुणगान गाणा-या, मोदीला येड्यात काढणा-या पोस्ट स्क्रोल करत जातो. लाईक केलेल्या लोकसत्ता, लोकमत, सकाळ वगैरे पेजेसवरील ताज्या बातम्या डोळ्यांसमोर येत जातात. इटलीत एका दिवसात 800 पेक्षा जास्त लोक मेलेत. प्रेतं गाडीत सरपणासारखे रचून नेले. चिनपेक्षा अमेरिकेत कोरोना जास्त पसरलाय. मोदींनी 21 दिवस भारत लॉकडाऊन केलाय. फेरफटका मारायला घराबाहेर पडला आणि पोलिसांनी त्याची अशी जिरवली. पोरानं बापाचा मृतदेह मोटरसायकलवरून नेऊन केले अत्यंसंस्कार. लॉकडाऊनचा फायदा घेत सोळावर्षीय विद्यार्थीनीवर 10 जणांचा आळीपाळीनं बलात्कार. जमावबंदी असूनही अमुक ठिकाणी मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जमले नागरिक: गुन्हे दाखल. लॉकडाऊनचा फायदा घेत 60 वर्षाच्या आजीवर बलात्कार करू बघणा-याच्या जिभेचा आजीने पाडला तुकडा, काळाबाजारीसाठी नेत असलेल्या कोट्यावधी किंमतीच्या मास्कचा साठा जप्त. कुण्या रविशंकरचा मृतदेह उचलायला कोणीच न आल्यानं शेजारच्या मुस्लिम बांधवानी त्याची अंत्ययात्रा काढत केले अंतिमसंस्कार. अमुक अभिनेत्री कोरोनाग्रस्त - बॉलीवुड व राजकीय वर्तुळात खळबळ. फलान्या गावात भरदिवसा ट्रॅक्टरमधील धान्य व पीठाच्या गोण्यांची जमावाकडून लूट. बापाने अडीच वर्षाच्या मुलीचे प्रेत खांद्यावर नेत केले अंत्यसंस्कार. अमुकटमुक हॉस्पिटलमधून कोरोग्रस्त रूग्णाचे पलायन- शोधाशोध सुरू, मुलाच्या 13व्याला आईने केले मोफत 2000 मास्कचे वाटप,  घरातच बसा असे सांगणा-या पोलिसांवर केला गावक-यांनी हल्ला - गुन्हे दाखल. कंपन्या बंद केल्यानं,  बांधकामं बंद केल्यानं रोजगार नसलेले शेकडो मजूर कामगार निघाले पायीच घराकडे. खायलाप्यायला काहीच मिळत नसतानाही गावी जाण्यासाठी  हजारो मजूर उपाशीपोटी उतरले रस्त्यावर. शेकडो किमी पायी प्रवास. लॉकडाऊनची ऐसी की तैसी. संसर्ग पसरण्याचा वाढला धोका. इंग्लंडचे प्रिन्स , इंग्लंडचे पंतप्रधान व आरोग्यमंत्रीही करोनापॉझिटीव्ह. बारामतीत शेकडो प्रवाश्यांना सोडणा-या रिक्षाचालकाला झाला कोरोना, लोकांनी घरातच बसावे म्हणून रामायण, महाभारत, स्वराज्यरक्षक संभाजी, शक्तिमान या मालिका पुन्हा सुरू.  ट्रक, टँकरमध्ये जनावरांसारखे कोंबून अनेक मजूरांचा विनापरवाना प्रवास सुरूच, राज्यावर कोरोनामुळे कोसळलेल्या आर्थिक संकटाच्या भितीने जर्मनीतल्या अर्थमंत्र्याची आत्महत्या, लॉकडाऊनमुळे दारू प्यायला मिळत नाही म्हणून केरळमध्ये पाच तळिरामांची आत्महत्या, घरातला कर्ता माणूस गेल्यावर चार खांदे न मिळाल्यांनं दोन दिवस घरातच पडून कुजलेल्या प्रेतावर ग्रामसेवकाने केले अंत्यसंस्कार,  दिल्लीत स्टेशनसमोर हजारो परप्रांतीय घरी जाण्यासाठी ताटकळले, आधीच संकटात असलेल्या शेतक-यांना अवकाळी पावसाचा फटका, संत्री-द्राक्षांच्या बागांचं मोठं नुकसान, कलिंगडं उचलायला मजूर मिळेना, सोंगणी करून पडलेला गहू भिजला, लाखो रूपये खर्च करून मेहनतीनं पिकवलेल्या पिकाला बाजारापर्यंत नेण्याची व्यवस्थाच नाही. नेलं तर भाव नाही. कर्जबाजारी शेतकरी चिंताग्रस्त. कुण्या राज्यात पायी प्रवास करणा-या मजुरांना जंतुनाशकाने अंघोळ घालत केलं निर्जंतुकीकरण- सर्वत्र संतापाची लाट , मजुराला आपल्या दहा वर्षाच्या लेकराचा  मृतदेह 88 किमी पायी चालत हातांवरच न्यावा लागला वाहून. गावक-यांनी गावात येण्याच्या सगळ्या सीमा केल्या बंद - स्थलांतरीतांची होतेय हेळसांड,  नफेखोरी करणा-या दुकानदारांवर शासन करणार कारवाई. कोरोना विषाणू चिननेच निर्माण करून पसरवल्याचा अमेरिकेचा दावा, तिसरे महायुद्ध होणार? नागरिकांत नैराश्य पसरू नये म्हणून अमेरिकन यंत्रणेने नागरिकांना योग्य दक्षता घेत हस्तमैथुन करण्याची केली सूचना...... अशा एक ना अनेक बातम्या डोळ्यांसमोरून सरकत जातात. कोरोनाने मरणा-यांपेक्षा भुकेने, आजाराने मरणा-यांची संख्या जास्त असल्याचं लक्षात येतं.करोनानं मरणारे तर भाग्यवानच. शासकीय गाडी, अंब्युलंसतरी मिळते स्मशानभूमीपर्यंत. इतरांच्या प्रेतांची हेळसांड बघून, कामगार मजूरवर्गाचे हाल बघून माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. अश्रू गालांवर ओघळणार तोच मी ते हातातल्या रूमालानं पुसतो. पोटासाठी या राज्यातून त्या राज्यात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, या गावातून त्या गावात स्थलांतरीत झालेल्या आणि आता मालकानं हाकलून लावल्यानं पुन्हा पोटासाठी गावाकडे पायीपायी निघालेल्या मजुरांच्या हतबलतेशी तादात्म्य पावण्याचा मी प्रयत्न करतो. कोरोनाच्या सावटाखाली लॉकडाऊनच्या विळख्यात सुकलेल्या ओठांचं रक्ताळल्या पायांसह सैरभैर झालेलं त्यांचं विझुविझु झालेलं जग स्मरून मन विषण्ण होत जातं. गलबलून आल्यानं फुरफुरायला लागलेलं नाक मी रूमालानं  पुसतो. घसा पुन्हा खरखरायला लागलाय हे पुन्हा माझ्या लक्षात येतं. मी हात धुवायला बेसिनकडे पळतो. एव्हाना बायको उठलेली असते. हात धुताना बायकोला लाडात हाक मारत आल्याचा चहा करायला सांगतो. "तुम्हीच करा. माझं ऐकता का काही? साधी आवडती मालिका बघू देत नाही मला...... " तिच्या तोंडाचा पट्टा सुरू होतो तसा मी पुन्हा हॉलकडे पळतो. खरंच मला कोरोना तर झाला नाही ना? बायकोला आपली काडीचीही चिंता नाही म्हणत गुगलवर पुन्हापुन्हा कोरोनाची लक्षणं सर्च करत राहतो. कफ सिरप घेतो, कोमट पाण्याच्या गुळण्या करतो, आलं मिरी दालचिनी घालून उकळलेला चहा घेत राहतो. हळद टाकून दुध पीत राहतो. वारंवार हात धुत राहतो.

घरात सोशल डिस्टंसींग न पाळणा-या माझ्या मुलांवर मी वारंवार खेकसतो. बायकोसोबत वाद होणार नाही याची दक्षता घेतो. दररोज आपण आठदहा तास आणि मुलं सहासात तास घराबाहेर असताना तिला घरात असलेलं स्वातंत्र्य आता 24 तास सगळे घरीच असल्यानं हिरावल्या गेल्याचं समजून घेऊन अनेक दिवस असेच घरात काढावे लागणार आहेत हे लक्षात घेता मी प्रकरण सामोपचारानं सोडवण्याचा प्रयत्न करतो. मुलांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणत्या वेळी कोणतं काम करायचं याचा टाईमटेबल बनवायला सांगतो. मुलं मोठ्या मेहनतीनं तो पक्षपातीपणे बनवतात. त्यात हस्तक्षेप करून मी खास वेळ व्यायाम, वाचन, बातम्या व बायकोच्या मालिकांसाठी राखून ठेवतो. सर्वांनी तो कटाक्षानं पाळावा याकडे लक्ष देतो. अर्थात तो पाळल्या जात नाहीच. थोडीफार धुसपुसही सुरू राहते. मी समेट घालत राहतो.
मी घरातल्या घरात धावतो. हलकासा व्यायाम करतो. बायकोमुलांत रमण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासोबत चेस, कॅरम, चंफुल, अंताक्षरी... खेळतो. पुस्तकं वाचतो. जमेल तशी पुन्हापुन्हा टीव्ही पाहतो. लॉकडाऊनचं पालन न करणा-यांना साजुक शिव्या हासडत चरफडत राहतो. गावाकडे फोन करून आईवडिलांना, भावाबहिणींना, मित्रांना काळजी घेत कटाक्षानं घरातच रहायचं सांगतो. काही सकारात्मक बातम्याही येतात. मराठमोळ्या गर्भवती रणरागिणीने बनवली कोरोना चाचणी किट. अनेक कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण निगेटिव्ह होऊन घरी रवाना. टाटांकडून तसेच अनेकांकडून भारत व राज्यसरकारला कोरोनाशी लढण्यासाठी कोट्यवधी रूपयांची मदत. कोरोनामुळे मरणारांची संख्या फक्त 2 ते 3 टक्केच!  जरा बरं वाटतं. मी नाकाची, घशाची, माझ्या मुलांची काळजी घेतो. घरातल्या सगळ्या दारांच्या कडीकोंड्यांची डेटॉलच्या पाण्यानं वारंवार सफाई करतो. बायकोला कामात मदत करतो. व्हाट्सॅप, फेसबुक पाहतो. भारतासह जगभरातले कोरोनाग्रस्तांचे मृत्युंचे भराभर वाढणारे आकडे पाहत पॅनिक होत राहतो. हळहळतो.

माझी दाढी लोंबली आहे. डोक्याचे केस वाढले आहेत. घरच्या घरी दाढी करणं शिकून घेतलं असतं तर किती बरं झालं असतं या विचारात मी दररोज काही मिनीटं घालवतो. ज्यांना ते येतं त्यांचा मला हेवा वाटतो. सुस्कारा सोडत मी दाढी वाढवून नवा लुक स्विकारण्याचं ठरवतो. जास्तीत जास्त सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो. बेघरांसाठी प्रार्थना करतो. आहे त्या परिस्थितीत दिवस ढकलू लागतो.

बाहेर काहीही झालं तरी मी घरातच राहतो. मी जगावर आलेल्या या भयंकर संकटात एक सुजाण नागरिक बनून राहण्याचा, देशावर कोसळलेल्या या जीवघेण्या आपत्तीत देशाचा निस्सीम देशभक्त होण्याचा भाबडा प्रयत्न करत राहतो.

~ राजीव मासरूळकर

Saturday, 28 March 2020

या महिनाभराच्या तपश्चर्येनंतर

तर
या महिनाभराच्या तपश्चर्येनंतर
आपल्याला मिळालेला असेल
एक नवा निर्मळ जन्म
आपल्या अवतीभवती असेल
नवं आभाळ असलेलं एक नवं चकचकित जग
ज्यात आपण घेऊ शकू
निर्भेळ मनमोकळा श्वास
गळून पडले असतील सगळे
गळ्याभोवती आवळलेले जुने फास

या महिनाभराच्या तपश्चर्येत
मनाच्या डोहात विहरताना
लागलेले असतील आपल्या हाती
काही नवे ठाक
उतरलेली असेल
आपल्या डोळ्यांवरची कृत्रिम झाक
म्हणूनच
आता आपण जेव्हा भेटू
तेव्हा एकदम नवे असू
चेह-यावर असेल हवेहवे हसू
झाडं असतील टाळ्या
आपल्यासाठी वाजवत
पक्षी असतील आपलंच
विजयगान गात
निर्विकार झालो असूत
जगासारखे आपण
गेला असेल ग्रीष्म निघून
आला असेल श्रावण
नात्यांच्या प्रेमसरींत
चिंब भिजत राहू
अशा सुंदर जगाचेच
स्वप्न सतत पाहू

तर
या महिनाभराच्या तपश्चर्येनंतर
नव्या आभाळाच्या नव्या जगात
नवा जन्म लाभलेले आपण
बदलू जुन्या जगाचे धोरण
बांधू नव्या युगाचे तोरण!

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि.28 मार्च, 2020

Friday, 27 March 2020

कोरोना संकटाचे जीवनशैलीवर होऊ शकणारे दीर्घकालीन परिणाम

कोरोना विषाणूचे जागतिक संकट लक्षात घेऊन वेगवेगळ्या खबरदा-या जागतिक स्तरावर घेण्यात येत आहेत. हे संकट निवळल्यानंतर त्याचे जागतिक (विशेषत: भारतीय) जीवनशैलीवर होणारे काही सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय परिणाम नक्कीच दिसून येतील. त्यातील काही शक्यता पुढीलप्रमाणे असू शकतील  :

1)नेहमी घराबाहेर फिरणा-या लोकांना घरात बसून राहण्याची, घरात अधिक वेळ घालवण्याची सवय लागू शकते.

2)लोकांचा धर्मसंस्थेवरील विश्वास कमी होऊ शकतो. प्रार्थनास्थळे व धर्मस्थळांच्या भेटी, सहलींत घट होऊ शकेल. अशा ठिकाणी भरणा-या यात्रांच्या गर्दीत दरवर्षी घट होत जाईल. धार्मिक स्थळांच्या जागतिक पर्यटनावरही परिणाम होईल. जगावर आपली पकड निर्माण करण्यासाठी धर्मसंस्था वेगवेगळे उपाय योजत पुन्हा सक्रीय होईल आणि भौतिक सुखापेक्षा आत्मिक सुखाचे दाखले देत यशस्वीही होत राहिल.

3)मास्क हा दैनंदिन जीवनाचा भाग होईल. पुरूषांमध्ये कदाचित याची फॅशनही येईल. गर्दीच्या ठिकाणी पुरूष मास्क लावून (व महिला नेहमीप्रमाणे स्कार्फ बांधून) फिरताना दिसतील. दवाखान्यांत मास्क घालून येणारांणाच प्रवेश दिला जाण्याचा निर्णय अनेक ठिकाणी घेतला जाईल. मास्क निर्मिती करणा-या कंपण्यांना चांगले दिवस येतील. कदाचित पुरूषांच्या पेहराव्याची फॅशन बदललेली असेल.

4)घरोघरी बाहेरून आल्याबरोबर हात धुण्याला प्राधान्य राहिल. ज्यांच्याकडे वाशिंगमशीन आहे त्यांना बाहेरून आल्याबरोबर कपडे धुवायला टाकण्याची सवय लागेल व पुढे ती एक प्रथाच होईल. सॅनिटायझर्सच्या कंपन्यांची भरभराट होईल. दवाखान्यांत प्रवेशद्वाराजवळच हँडवॉश स्टेशन उभारले जातील. घर, शाळा, प्रार्थनास्थळांवरही ही व्यवस्था प्रवेशद्वारांवरच असेल. स्मशानभूमीवरही ही व्यवस्था राहिल. सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवली जाईल व त्यांची स्वच्छता हा प्राधान्याचा विषय होऊन जाईल.

5)Work from home हा कार्यसंस्कृतीचा एक भाग होऊन जाईल. घरी बसून करता येण्यासारख्या कामांचा शोध घेतला जाईल. या क्षेत्रात नव्या कंपन्या उतरतील. गंभीर आजारी कर्मचारी वगळता दीर्घ रजेवर जाणा-या कर्मचा-यांना कदाचित work from home ची अट घातली जाऊ लागेल.

6) Study from home या संकल्पनेला प्रोत्साहन मिळेल. Home schooling रूजू लागेल. बायजूस, वेदांतू, टॉपस्कोअरर यांसारख्या शैक्षणिक Apps चे पीक येईल आणि घरी बसून online शिकण्याचा खर्च खाजगी इंग्रजी शालेय खर्चाच्या कितीतरी पट कमी होईल.

7)लोकांची भेटतांना हातात हात घेण्याची, मिठी मारण्याची, मित्रांच्या घरी सहपरिवार जाऊन यथेच्छ गप्पा मारण्याची सवय कमी होत जाईल. कुणाच्या घरी मुक्काम करणे  नामशेष होत जाईल. लग्नकार्यात होणारी गर्दी घटत जाईल. रजिस्टर पद्धतीचे लग्न, एका दिवसात विवाह यांचे प्रमाण वाढू लागेल.

8)वर्षभरात एक दिवस 'Lockdown Day' (भारतात 22 मार्च) म्हणून पाळला जाऊ लागेल. प्रदुषण व पर्यावरणविषयक इतर जागतिक समस्यांवरील उपाययोजना म्हणून हे केले जाईल. भविष्यात प्रत्येक महिन्यात एक दिवस, त्यापुढेही जाऊन आठवड्याचा शनिवार किंवा रविवार Lock down करण्याच्या आवश्यकतेवर निश्चितच विचार होऊ शकेल. संकटकाळासाठी तर 'Lockdown' हा परवलीचा शब्द होऊन जाईल.

9)दुस-या महायुद्धानंतर अणवस्रांबाबत जागतिक पातळीवर जशी पावले उचलली गेली, तशीच पावले प्रयोगशाळेत विषाणुनिर्मिती करण्याबाबत उचलली जातील. तरीही काही देश राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत विषाणुनिर्मिती व त्यांच्या चाचण्या करत राहू शकतील.

10)देशावर आलेल्या आरोग्यविषयक भयावह महामारीसारख्या संकटकाळात वयोवृद्ध, गंभीर आजारी व बेवारस , भिकारी लोकांना मरू दिले जाणे शिष्टसंमत मानले जाईल .

11)युवाल नोव्ह हरारी म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या हालचालींवर पाळत ठेवण्याचे तंत्रज्ञान वाढत जाईल. आपण बाळगत असलेल्या व आपल्या शरीरावर बसवलेल्या यंत्राद्वारे सरकार अथवा त्रयस्थ संस्थेकडे जमा होणा-या माहितीद्वारे देशाचा व जगाचा बाजार नियंत्रित केला जाऊ लागेल. देशाचे व जगाचे राजकारणही या माहितीद्वारे प्रभावित असेल. काही देश हुकुमशाहीकडे झुकू लागतील. गोपनियतेला सुरूंग लागत राहिल.

तर कोरोनाव्हायरसचं संकट टळल्यावर आपलं जग एकंदरीतच वरील बाबींसारखं बदलत जाईल असं मला वाटतं.
अर्थात या सगळ्या जरतरच्या बाबी असल्या तरी त्यातल्या काही निश्चितच ख-या ठरणा-या असू शकतात.

आपली काही खास निरीक्षणं असतील तर नक्कीच सुचवावीत.

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
    दि.27/03/2020
    

Tuesday, 24 March 2020

तुम्हीच ईश्वर आहात...

तुम्हीच ईश्वर आहात
हो, तुम्हीच

तुम्ही जन्माला आलात
आणि जन्माला घातलंत एक मोठं जग
मोह असो कि माया
तुम्ही वाढवलंत हे जग तनमनानं
मायबाप, नातीगोती, घरदार, पैसाअडका, कामधंदा, वगैरे वगैरे....
हे जग अनंत काळापर्यंत टिकून रहावं
म्हणून झटत आहात क्षणोक्षणी
तुमच्याकडेही आहे शिक्षणाचा तिसरा डोळा
किंबहुना माहितीतंत्रज्ञानाचा चौथा डोळाही
आता तुमच्या मुठीत आला आहे लिलया
फक्त या सगळ्यावर तुमचीच वक्रदृष्टी पडू नये
आणि सुरू होऊ नये सर्वत्र मृत्यूचं तांडव...
उत्पत्ती, स्थिती, लय तुमच्यातच आहे
बघा, तुम्हीच ईश्वर आहात...!

तुम्ही जनताजनार्दन
तुम्हीच गण आणि तुम्हीच आहात गणपती
पृथ्वीप्रदक्षिणा म्हणून आईवडिलांभोवती फेरी मारणारेही तुम्हीच तर आहात
तुमच्याकडे आहेत रिद्धी, सिद्धी आणि प्रखर बुद्धीही
कला आणि ज्ञानाचे भंडार तुम्हीच खुले करू शकणार आहात
काही दिवस घरात राहून तप:साधनेतून
सुखकर्ता... दुखहर्ता तुम्हीच आहात
तुम्ही ईश्वर आहात

संपूर्ण पृथ्वीवर प्रेम करून
तिचे रक्षण करण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे
तुम्हीच तर आणू शकता सर्वत्र रामराज्य वगैेरे
अचानक अवतरलेल्या बहुरूपी बहुशक्तीशाली महाभयंकर करोनारावणाने
तुमची सुख, शांती, प्राणरूपी सीता पळवून नेलेली आहे
तुमच्याच आत आत आत
तिचा तिथेच शोध घेत
स्वत:शीच युद्ध पुकारून रावणदहन केल्याशिवाय
कुठलाही उत्सव साजरा करायचा नाहीय तुम्हाला तुमच्या प्रजेसोबत
आणि हो, खबरदार
सीता आली तरी
तिच्या शालीनतेवर बोट ठेवणारे परीटही
असतीलच आजुबाजूला
म्हणून तिला द्यावी लागणार आहेच पुन्हा पुन्हा
अग्नीपरीक्षा
म्हणून आखून घ्या स्वत:भोवती लक्ष्मणरेषा
आणि स्वत:च्या कुटुंबासाठी शबरी व्हा काही दिवस
दिवाळी दूर नाहीच
फक्त विसरू नका, तुम्हीच ईश्वर आहात!

तुमच्यातच आहे भवतालाकडे दुर्लक्ष करणारा अंध धृतराष्ट्र
तुमच्यातच आहे दूरदृष्टी असलेला संजय
असंख्य जबाबदा-या पेलूनही प्रसंगी अब्रुहरण सहन करावं लागलेली
पांचालीही आहे तुमच्यातच
कधीही खोटं न बोलणारा खोटं न वागणारा
धर्मही तुम्हीच आहात
संभ्रमावस्थेतील अर्जूनही तुम्हीच
आणि करंगळीवर पर्वत उचलून
गोकुळाचं रक्षण करण्यापासून
जे घडतंय ते माझ्याच इशा-यावरून घडतंय
जे होईल तेही चांगलंच होईल
हे सांगणारा विराट कृष्णही तुमच्यातच आहे..

आता पुन्हा एकदा महाभारत घडू द्यायचं कि नाही
तुमचे हात तुमच्याच वंशवधाने मलीन होऊ द्यायचे की नाही
हे फक्त तुमच्याच हातात आहे...

तुम्हीच अल्लाह आहात, येशू, बुद्ध, महावीर,
गुरू आणि गुरूग्रंथ साहिब.....
सर्व तुम्हीच तर आहात
तुम्हीच आहात तुमचे तारणहार...
हो, तुम्हीच
तुम्हीच ईश्वर आहात!

राजीव मासरूळकर
दि.24/03/2020
सकाळी 08:00

Saturday, 21 March 2020

प्रयोगशाळा

जग आहे की
प्रयोगशाळा
प्रयोग चालू
येथ निरंतर
युद्ध येथली
अटळ व्यवस्था
पुराणवांगी
शिजती सत्वर
जाळ चाक घर
कुणी शोधले
कुणी बोलणे
घडवत गेले
ठरल्या व्याख्या
वस्तू सगळ्या
सगळे माझे
फुगे पिपासा
कुणी शोधला
ईश्वर अल्ला
कुणी घातली
भिती अनामिक
कुणी शोधले
विधी आगळे
दगडाला
देवत्व लाभले
कुणी सांगतो
शुन्यच सगळे
कुणी म्हणे फळ
पडते खाली
प्रेम करा रे
सांगत कोणी
परक्यांवर नित
द्वेष ओकतो
कुणी मंदिरे
बांधत फिरतो
कुणी कोरतो
सुंदर लेणी
कुणी जन्मतो
मुर्तीभंजक
अंती त्याचे
बनते थडगे
कुणी घडवतो
तगडे सैनिक
कुणी प्रसवती
गुणी खेकडे
ज्याच्या मागे
उभे घोळके
त्याची सत्ता
तत्व नागडे
कुणी शोधले
सोने मोती
कुणी राहिले
खोदत माती
कुणी शोधली
लिपी लाघवी
फुगवीत बसले
पोकळ छाती
कुरघोडी कर
कुरघोडी कर
कुणी शहाणा
सांगत सुटला
कुणी निघाला
जिंकत पृथ्वी
कुणी म्हणाले
माया सगळी
कुणी त्यागुनी
संसाराला
वनात गेले
स्वत:स शोधत
संसाराच्या
संसर्गावर
कुठे मिळाले
कुणास औषध
कुणी म्हणाले
जे आहे ते
सगळे सगळे
करुया सोपे
कुणी शोधला
पैसाअडका
कुणी बदलले
घरटे खोपे
मंत्र गळाले
तंत्र उगवले
युग अवतरले
घड्याळवेडे
यंत्रयुगाचा
मुखडा भोळा
विज्ञानाचे
त्यावर मुस्के
अणू मिळाला
अन् अजरामर
अणुयुद्धाचा
विध्वंसक ज्वर
कधी न शमला
जात, धर्म अन्
वर्णद्वेष या
पृथ्वीवरला
पृथ्वीचा रस
काढत चाखत
विकास भोगत
आला मानव
प्रयोग तिकडे
होतो आहे
चंद्र मंगळा
आता सावध
मुठीत आले
विश्व कुणाच्या
विश्व कुणाचे
विखरुन गेले
जितक्या भिंती
पाडुन झाल्या
नव्या तेवढ्या
उठल्या भिंती
प्रयोग आहे
सुरू निरंतर
कसे कुणाला
करू निरूत्तर
सरहद्दींचा
घेउन ठेका
कुणी होतसे
मानवतस्कर
माज यशाचा
करू साजरा
यातच आहे
जनहित मानू
शोधत राहू
सोडत राहू
शत्रुंवर नित
कैक विषाणू
हेच संक्रमण
पिढीत पुढच्या
पसरण्यास
वाढवूत शाळा
भविष्य मोठे
सुंदर आहे
फक्त अनुभवा
प्रयोगशाळा!

राजीव मासरूळकर

Friday, 6 March 2020

बा करोना... ये, तुझं स्वागत आहे!

बा, करोना... ये, तुझं स्वागत आहे!
अगदी वेळेवर आलास बघ तू
तुझ्या वाटेला डोळे लावूनच तर बसलो आहोत आम्ही जन्मापासून
ये, तुझ्या स्वागतास हा अखंड हिंदुस्थान सज्ज आहे!
तुझा सामना आता आमच्याशी आहे!
(तशी अगदी संपूर्ण मानवजातच सज्ज आहे म्हणा...
पण मानवजात वगैरे सगळं फोल असतं रे..)
ऑ... विचारात पडलास?
स्वागत वगैरे का म्हणून..?
सोड रे... तुला घाबरण्याइतकं डरपोक थोडंच आहे आमचं रक्त!
(समाजमाध्यमांवर तुझा नायनाट करण्यासाठी
सूचवले जात असलेले जालीम विनोदी उपाय आठवून बघ)
कळ्ळंकाय...?
चिननं दाखवलंय तुझं अक्राळविक्राळ रूप सबंध जगाला.
सतत फुत्कारत, आग ओकत राहणारा एवढामोठा ड्रॅगन
तुला बघताच चळाचळा कापायला लागला हे म्हायती झालंय शेंबड्या पोरांनाही
म्हणून आम्ही घाबरून जावं असं काय नवीन जीवघेणं वैशिष्ट्य आहे तुझ्यात... सांग तरी!
नुकतीच कोवळी लुसलुशीत जावळं दिसू लागलेल्या डोक्याखाली असलेल्या
तुझ्या निष्पाप तुकतुकीत कपाळावर
प्रश्नार्थक आठ्यांचं वाढत चाललेलं जंगल बघून
मला किती असुरी आनंद होतोय तुला कसं सांगू...!
घाबरू नकोस... तुझी उत्सुकता तुटेपर्यंत ताणणार नाही मी ...
ये इकडे, जरा बस, पाणी पी, थोडा हस
लाजू नकोस, नाहीय लस
दुरून आलास, थकुनभागून
पाय पसर... देऊ दाबून....?
हां... किती शहाण्यासारखा वागतोयस आता!
चल, डोळे मिट बघू हळुहळु
तुझ्या सोनेरी जावळांतून माझी करामती बोटं फिरवत
तुला काही गोष्टी सांगेन म्हणतो मी
पण नुकताच जन्मलेला तू...
तुला सांगावं की सांगू नये हा प्रश्न
तुझ्यामुळे सध्या सुरू असलेल्या हाहा:कारापेक्षा
अधिक तिव्रतेने सतावतोय मला...
खूप लहान आहेस रे तू अद्याप,
कळेल तुला हळुहळु
खरं सांगू...?
तुझ्या येण्याचं कुठलंच अप्रुप नाहीये आम्हाला
का म्हणून विचारतोयस म्हणून
इच्छा नसतानाही सांगतोय तुला... नीट ऐक
या भूमीवर आम्ही जन्मलो तेव्हापासूनच
माणसाळवून ठेवलेयत आम्ही HIV सारखे  महाभयंकर व्हायरस
बा करोना, HIV तर आमच्याही आधीचा
आमच्या बापजाद्यांच्याही आधीचा
मूळपुरूषासारखाच जणु...
तूही त्याचाच वंशज असावास
म्हणजे दूरचा का होईना .. आमचा नातलगच!
त्यानंतर अनेक आक्रमक व्हायरस आले क्रमाक्रमाने
....देवी, गोवर,पोलिओ, चिकुनगुनिया, इबोला वगैरे वगैरे
आम्ही लढलो त्यांच्याशी निकरानं
या संघर्षात आमच्या असंख्य पिढ्या कामी आल्या
काही आम्ही संपवले,
काही आम्हाला हरवून स्थिरावले इकडेच आमचेच होऊन...
हो हो हो... अरे थांब जरा!
झाली लगेच लागन तुलाही?
इतिहास ऐकल्याबरोबर लगेच लागलास फुगवायला छाती
56 इंचांपर्यंत...
याच भितीमुळे तर सांगणार नव्हतो ना मी तुला हे...
इतिहास हा कडुगोड परिणाम दाखवणारा एक व्हायरसच आहे का
यावर सध्या संशोधन सुरू आहे आमच्याकडे
कधी महिन्याला, कधी आठवड्याला, कधी दररोजच
प्रयोग करीत असतो आम्ही
इतिहास उगाळून रक्तपात घडतो का या विषयीचे
रक्तपात घडतोच पण त्याच्यामागे इतिहास हाच व्हायरस आहे
हे काही केल्या सिद्ध होऊ शकलेलं नाही..
तुला त्याची लागन होऊ नये म्हणून मी काळजी घेतोय... बस्स एवढंच!
(फितुरीचाही मोठा इतिहास आहे बरं का आमच्याकडे
मी ही एक फितुरंच... असं म्हणतोस?
असू दे असू दे.. मला नाही पर्वा त्याची!)
तसं बस एवढंच नाही, बरंच काही सांगायचंय तुला
विचारायचंही आहे...
मला सांग, जन्माला आल्यापासून
किती माणसांचे जीव घेतले आहेस तू पृथ्वीवर?
पाचपंचवीस हजार ना?
तुला माहितीये दररोज अपघाताने जगभरात किती लोक मरताहेत?
कँसरने दररोज जीव गमावणारांचा आकडा माहितीये तुला?
हृदयविकाराने किती जण जग सोडून जातात दररोज?
अजून किती जीवघेणे आजार सांगू?
खायला अन्न नाही म्हणून तळमळून कितींचा प्राण जातो?
आणखी एक,
केवळ आमच्या एकट्या अखंड वगैरे  भारतात आत्महत्या नावाचा एक महाभयंकर विषाणू
दरमहा किती गळ्यांना फास लावतो माहितीये? दरमहा सुमारे 1000....
तू आल्यापासून किती न् काय दिवे लावलेस?
तू गर्भगळित व्हावंस म्हणून काही मी हे सांगत नाहीये
अभ्यास कर. पुढच्या वेळी येशील तेव्हा प्रचंड तयारीनिशी ये..
कळ्ळंकाय ..?
महत्वाचा विषय बाजुलाच राहिला बघ...
धर्म नावाचा एक अत्यंत जटिल विषाणू
संपूर्ण पृथ्वीभर पसरलाय
तू येण्याच्या खूप खूप आधी
आमच्या जन्मानंतर लगेचच....
माणसाने धर्म जन्माला घातला कि धर्माने माणूस
इतिहास धर्मातून आला की इतिहासातून धर्म
या वादात पडण्यात बिल्कुल स्वारस्य नाही आम्हाला
आमचा रस धर्म-जातींच्या कडेकोट बंदोबस्तात आहे
अनेक रूपांत प्रकटलेला, अनेक शाखांत विभागलेला
हा महाजटिल विषाणू दररोज
शेकडोच्या संख्येत आमचं रसग्रहण करतो
आणि आम्ही त्याचं रसग्रहण करतो!
सत्य, अहिंसा, प्रेम, कर्म, दया, दु:खमुक्ती, मानवता इत्यादि
प्राणतत्वांतून जन्मलेला असूनही
तो दररोज त्यांचाच प्राण कंठाशी आणत सुटलेला आहे...
आजघडीला तो समाजमाध्यमांवरील अफाट अतिरंजित
असंबद्ध माहितीवर पोसला जात असून
तंत्रज्ञान मुठीत घेऊन फिरणा-या मेंदूमेंदूत
द्वेष पसरवण्याचं, बुद्धीभेद करण्याचं,
दंगली घडवण्याचं कर्तव्य बेमालुमपणे निभावताना दिसतेय...
गेल्या शतकादोनशतकातला दंगलींचा , छुप्या-उघड धर्मयुद्धांचा इतिहास अभ्यासून बघ
विषाणुंच्या धर्मांत जन्मल्याचा तुझा अहंगंड गळून पडेल कदाचित...
नेपाळमध्ये भूकंप होतो, देश मदतीला धावतो
जपानमध्ये त्सुनामी येते, देश मदतीला धावतो
चीनमध्ये करोना येतो, देश मदतीला धावतो
ऑस्ट्रेलियात जंगल पेटतं, आम्ही कळवळून उठतो
प्रसंगी पाकिस्तानात नैसर्गिक, आरोग्यविषयक संकट उद्भवलं तरी आम्ही मदतीला धावून जातोच
पण देशातल्या भिन्नधर्मी, भिन्नजातीयांसोबत उसळणा-या दंगलींचं काय?
महिलांवर होणा-या अत्याचाराचं काय?
देशादेशांत सुरू असलेल्या  धर्मयुद्धांचं काय....?
या सगळ्याला सरावलो आहोत रे आम्ही
असे असंख्य महाभयंकर विषाणू आमच्या नित्य जगण्याचा भाग झालेले आहेत,
काही खेळणी म्हणून खेळण्याचा भाग झालेले आहेत...
आम्ही या जुन्या खेळातंच आत्मघात करत संपून जाणार आहोत
हे ठरलेलं आहे..
मग तुझ्या येण्याचं कौतुक ते कितीसं असणार?
तू नवा आहेस इतकंच काय ते नवल
नव्याचे नऊ दिवस म्हणून उदोउदो होईल फारतर
पाहुणा म्हणून काही दिवस रहा,
मग आमचाच होऊन जा
तशी तू येणार असल्याची भविष्यवाणी
आधीच लिहून ठेवली गेलेली आहे आमच्याकडे
फक्त तू काही चमत्कार घडवून आणतोस का
याकडे लक्ष राहिल रे आमचं
तू आलास याचा थोडा आनंद आहेच
आणि हे स्वागतही त्यामुळेच!
(खरं सांगू का?
अजून एक भविष्यवाणी आहे
एका घासात पृथ्वी गिळंकृत करणा-या महाभयावह व्हायरसची..
त्यासाठीच तर अधीर झालेलो आहोत ना आम्ही?
त्यादिशेनंच तर वाटचाल सुरूय बघ.
पण तू आला आहेस तर असू दे... )
चल, मी जरा पाहुणचाराचं बघतो!

~ राजीव मासरूळकर


Wednesday, 19 February 2020

पुरुषा तुझी


एवढी झाली नजर का वाकडी पुरुषा तुझी
वाटते सोलून घ्यावी कातडी पुरुषा तुझी

तू तुझा इतिहास घे समजून जन्मापासुनी
घेतली गिरवून मी बाराखडी पुरुषा तुझी

जीभ छाटावी तुझी सीतेस वाटे कैकदा
लांघते भाषाच रेषा रांगडी पुरुषा तुझी

तूच तर केलीस खिचडी जात धर्माची तुझ्या
रीत पाळावी कशी घाणेरडी पुरुषा तुझी

सिद्ध कर श्रेष्ठत्व सत्कार्यातुनी प्रत्येकदा
सोड वर करणे कुठेही तंगडी पुरुषा तुझी

आजवर तू पेटवत आलास नारीला म्हणे
पेटवत होतास तू तर झोपडी पुरुषा तुझी

राऊळी करतोस पूजा, घालशी लाथा घरी
केवढी भक्ती निखालस बेगडी पुरुषा तुझी

हक्क देहाचा अबाधित ठेवते आहे स्वत:
प्रेयसी असले जरी मी भाबडी पुरुषा तुझी

भिडवुनी डोळा, तुझ्या खांद्यास खांदा लावुनी
सज्ज आहे मी वळवण्या बोबडी पुरुषा तुझी

(कोणत्या शाळेमधे पुरुषार्थ शिकवावा तुला
दाखवी पुरुषत्व केवळ काकडी पुरुषा तुझी)

कृष्ण शिवबा बुद्ध गांधी ज्योतिबा भिमराव तू
सद्गुणांनी भर पुन्हा तू पोतडी पुरुषा तुझी

~ राजीव मासरूळकर
   शिवजयंती
   दि. 19/02/2020, 02:30 AM

Thursday, 13 February 2020

जागा

रान केल्यावर जिवाचे भेटली जागा
आपली वाटे कशी ना आपली जागा

फारसा अंदाज घेता येत नसतो पण
सारखी डोळ्यास दिसते आतली जागा

आपल्या विश्वापलिकडेही किती विश्वे...
कोणत्या विश्वात आपण राखली जागा

जन्मत: आजन्म भटके जीव ना आपण
शोधतो आहोत का मग चांगली जागा

ठेवली काबूत त्रिज्या वर्तुळाची मी
मोकळी कोणाकरीता सोडली जागा

भेट ठरलेल्या स्थळी पाऊस भुरभुरला
केवढी तितक्यात ती मग तापली जागा

पावले वळतात आपोआप का तिकडे
विसरता येते जिथे आपापली जागा

~ राजीव मासरूळकर

Saturday, 25 January 2020

गझल : तिळाची ऊब राहो अन्


तिळाची ऊब राहो अन् गुळाचा गोडवा राहो
सदा नात्यामधे विश्वास आदर गारवा राहो

जगाशी गोड पण कायम खरे बोलू, खरे वागू
इथे अपुलेपणाची वाहती हसरी हवा राहो!

हरवते बालपण अन् एकटेपण वेढते हल्ली
सभोती ओल राहो पाखरांचाही थवा राहो

थकू दे देह कष्टाने वयाने दे जुना होऊ
परंतू श्वास अन् उल्हास कायमचा नवा राहो

मला होता न आले सूर्य अथवा चंद्र , ना हरकत
कुणासाठी तरी प्रेरक जिवाचा काजवा राहो

~ राजीव मासरूळकर