माझ्या शब्दांनो,
जागे व्हा !
असे मेल्यासारखे कितीक दिवस
पडून राहणार आहात तुम्ही ?
मृत्यू हे अंतिम सत्य असेल .....
तुम्हाला ते लागू नाही...!
तुम्ही प्यायला आहात
इथल्या ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक मंथनातून अवतरलेलं
महान सत्यामृत !
मी पाहतो आहे प्रखर वास्तव,
साहतो आहे आपल्यातल्यांचाच अत्याचार,
चाहतो आहे स्वार्थी जगात
अधुनमधून भेटणाऱ्या माणुसकीला,
राहतो आहे कोट्यावधी किड्यांच्या किरकिरीतही एकेकटा,
वाहतो आहे बेलगाम वाऱ्यासारखा निरूद्देश ,
दाहतो आहे स्वतःलाच आत्मपीडेच्या सरणावर
आणि नाहतो आहे निरागसांच्या नाहक सांडल्या गेलेल्या
रक्ताच्या थारोळ्यांत
क्षणोक्षणी . . . . . . .
तरीही तुम्ही गप्पच . . . ?
माझ्या मित्रांनो,
तुम्ही आत्मा आहात माझा
आणि मी तुमचं शरीर .....!
विसरू नका,
अजून मी जिवंत आहे....
तुमच्या विरहाचीच फक्त खंत आहे.
म्हणून म्हणतो , जागे व्हा !
मी पाहतो ते पाहून पेटून उठा !
मी साहतो , ते सहन न करता व्यक्त व्हा !
अन्याय अत्याचार करणाऱ्यांवर सक्त व्हा,
उमलणाऱ्या कळ्यांसाठी कौतुकभरला प्राजक्त व्हा,
हजारो हृदयातले तख्त व्हा,
मानवतेचे, महानतेचे भक्त व्हा,
व्हायचेच तर खरा माणूसच फक्त व्हा !
शाश्वत सुंदर वक्त व्हा !!
माझ्या आत्मिक शब्दांनो,
जागे व्हा , व्यक्त व्हा !
माणसाच्या हृदयामधून
झुळझुळणारं रक्त व्हा !
-राजीव मासरूळकर
दि.६ऑक्टोबर,२०१३